गुरुवारी (१८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ८ धावांनी पराभूत केले आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना होता. तसेच या सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघाने, ही मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे.
नाफेफेकीचा कौल पाहुण्या संघाच्या दिशेने लागला आणि त्यांनी यजमानांना फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना १८६ धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने ८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या थरारक विजयात काही खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळे ते खेळाडू सामनावीर पुरस्काराचे प्रबळ दावेदार होते. त्याच खेळाडूंचा येथे आढावा घेण्यात आला आहे.
१) हार्दिक पंड्या :
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा फलंदाजीमध्ये संघासाठी मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला. तरी सुद्धा तो भारतीय संघासाठी गोलंदाजीमध्ये मोलाची भूमिका बजावताना दिसला. भारतीय संघाने इंग्लंड संघाला १८६ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघातील मध्य क्रमातील फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होते. त्यावेळी हार्दिकने येऊन त्यांच्या खेळीवर ब्रेक लावला. हार्दिक ने ४ षटक गोलंदाजी करत अवघ्या १६ धावा दिल्या आणि २ गडी देखील बाद केले.
२) शार्दुल ठाकूर :
शार्दुल ठाकूरने सुरुवातीच्या २ षटकात जास्त धावा खर्च केल्या होत्या. तरी देखील विराट कोहली ऐवजी नेतृत्वपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माने शार्दुलवर डाव खेळला. त्याने १७ वे षटक शार्दुलला टाकण्यास सांगितले आणि याच षटकात सामना भारतीय संघाच्या दिशेने फिरला. शार्दुलने पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सला माघारी धाडले, तर दुसऱ्या चेंडूवर ऑयन मॉर्गनला माघारी धाडले.
तसेच शेवटच्या षटकात २३ धावांची गरज असताना, शार्दुलने पहिल्या ३ चेंडूवर ११ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर २ वाईड चेंडू फेकले होते. पुढील ३ चेंडूवर त्याने १० धावांची आवश्यकता असताना भारतीय संघाला ८ धावांनी विजय मिळवून दिला.
३) सूर्यकुमार यादव :
सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी -२० सामन्यात पदार्पण केले होते. परंतु त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत ५६ धावांची अर्धशतकीय खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १८५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून पहिल्याच टी-२० सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज ठरला.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवने सर्वांना मागे टाकले आणि चौथ्या टी२० सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला. अशाप्रकारे टी-२० कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात तो सामनावीर ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आहा! ‘कजरारे’ गाण्यावर कृणाल पंड्याने लावले पत्नीसोबत ठुमके, डान्स पाहून तुमचेही थिरकतील पाय
सूर्यकुमार यादवला सकाळी कळली ‘ही’ गोष्ट, मग इंग्लंडला चोप चोपलं अन् ठरला सामनावीर
‘विश्वचषकातील स्थान पक्क,’ सूर्यकुमारच्या आक्रमक खेळीची भारतीय दिग्गजाला भुरळ; उधळली स्तुतिसुमने