आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या शिखर धवनला या संघातून वगळण्यात आले होते. तर युजवेंद्र चहलला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच आर अश्विनला तब्बल ४ वर्षानंतर संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. या संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांची निवड केवळ आयपीएल स्पर्धेतील प्रदर्शन पाहून करण्यात आली आहे. कोण आहेत ते खेळाडू चला जाणून घेऊया.
१) सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादवने याच वर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यापासूनच त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच गेली काही वर्ष त्याने आयपीएल स्पर्धांमध्ये देखील सतत चांगली कामगिरी केली आहे.आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्यात त्याने ७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याला १७३ धावा करण्यात यश आले होते. तसेच श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. याच कामगिरीच्या बळावर त्याची टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
२) राहुल चहर : राहुल चहरने आयपीएल २०२० आणि २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या युजवेंद्र चहलऐवजी राहुल चहरला संधी देण्यात आली आहे.राहुल चहरने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७ सामन्यात एकूण ११ गडी बाद केले होते. (Players selected for T20 world cup on ipl based performance)
३) वरून चक्रवर्ती : वरून चक्रवर्तीने आयपीएल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती.त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. परंतु फिटनेस चाचणी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. परंतु त्याची गेल्या काही महिन्यातील कामगिरी पाहता तो भारतीय संघाच्या प्लेइंग इलेवनमध्ये देखील स्थान मिळवू शकतो. वरून चक्रवर्तीची खासियत म्हणजे तो सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये ही गोलंदाजी करू शकतो.त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यात ७ गडी बाद केले होते. तर २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतील १३ सामन्यात १७ गडी बाद केले होते.