भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२१-२२ (Ranji Trophy 2021-22) सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील प्री-क्वार्टर फायनल सामना झारखंड आणि नागालँड संघात होणार आहे. तत्पूर्वी मुंबई संघाचा कर्णधार (Mumbai Team Captain) युवा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने संघाच्या पुढील टप्प्यात पोहोचण्यावर आणि स्वत:च्या फलंदाजी प्रदर्शनावर (Prithvi Shaw On Batting Performance) महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सध्या चालू असलेल्या हंगामात शॉच्या खांद्यावर मुंबई संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आहे. मुंबई संघात अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी शिलेदार उपस्थित असतानाही संघ व्यवस्थापनाने युवा शॉवर ही जबाबदारी सोपवली आहे. शॉनेही त्यांचा विश्वास सार्थकी लावला आहे. मुंबई संघाने साखळी फेरी सामन्यांच्या टप्प्यात चांगले प्रदर्शन केले असून हा संघ बाद फेरी सामन्यांच्या टप्प्यासाठीही पात्र ठरला आहे.
मुंबई संघ रणजी ट्रॉफी २०२१-२२ मध्ये ड गटात होता. त्यांनी साखळी फेरी सामन्यांच्या टप्प्यातील ३ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि १ सामना अनिर्णीत ठेवला आहे. त्यांनी साखळी फेरीतील शेवटचा ओडिसाविरुद्धचा सामना जिंकत पुढील टप्प्यात जागा मिळवली आहे. मुंबई संघाने २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून हा संघ विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.
मुंबई संघाच्या यशाबद्दल पृथ्वी शॉ म्हणाला…
द हिंदूसोबत मुंबई संघाच्या बाद फेरी सामन्यांमध्ये प्रवेश करण्याबद्दल शॉ म्हणाला की, “आम्ही बाद फेरीमध्ये पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आमच्याकडे साखळी फेरीत केवळ ३ च सामने होते. त्यामुळे आम्ही बाद फेरीविषयी जास्त विचार करत नव्हतो. आम्ही निश्चितच बाद फेरीत पोहोचण्यासाठी खेळत होतो. परंतु संघातील कोणताही खेळाडू याबद्दल जास्त विचार करत नव्हता. मी सर्वांना वर्तमानात राहून प्रत्येक सत्राचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला होता.”
वैयक्तिक प्रदर्शनाबद्दल पृथ्वी शॉ म्हणाला…
भलेही रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रदर्शन शानदार राहिले असले, तरीही कर्णधार पृथ्वी शॉ वैयक्तिक प्रदर्शनात मात्र खास खेळ दाखवू शकला नाही. आतापर्यंतच्या ३ सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ १ अर्धशतक निघाले आहे. स्वत शॉदेखील त्याच्या फलंदाजी प्रदर्शनावर नाखुश आहे.
याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “खरे तर मी स्वत:च माझ्या वैयक्तिक प्रदर्शनावर खुश नाही. मी यापेक्षाही चांगली फलंदाजी करू शकलो असतो. तुम्हाला माहितीच आहे की, क्रिकेटमध्ये ४०-५० धावांची खेळी काहीच नसते. पण मला वाटते की, हे ठीक आहे. मी चांगली फलंदाजी करतो आहे आणि मला असे वाटत आहे की, मी लवकरच मोठी खेळी करेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
मोहाली स्टेडियम रवींद्र जडेजासाठी लकी! जबरदस्त प्रदर्शनानंतर अष्टपैलूने स्वतः सांगितले कारण
मोहाली कसोटीदरम्यान विराटची प्रेक्षकांसोबत मस्ती, संघाला चिअर करण्याचे अवाहन, व्हिडिओ व्हायरल
आयपीएल पाहण्यासाठी धोनीने चक्क ‘आऊट’ झाल्याचा बनवला बहाना, नवा प्रोमो घालतोय इंटरनेटवर धुमाकूळ