भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फ्लॉप ठरल्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. आगामी श्रीलंका दौऱ्यावरही त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकते. अशातच यशाच्या शिखरावर असताना त्याने आपल्या आयुष्यातील वाईट काळाला उजाळा दिला आहे.
पृथ्वी शॉने क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्ही सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी इंदोरमध्ये होतो. त्यावेळी माझी प्रकृती खालावली होती. त्यामुळे मी रात्रीचे जेवण करण्यासाठी बाहेर पडलो होतो. मला खूप सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. अशा परिस्थितीत मी वडिलांना फोन केला होता. त्यांनी मला मेडिकलमध्ये जाऊन कफ सिरप घेण्याचा सल्ला दिला होता. याबाबत मी माझ्या फिजियोला काहीच सांगितले नव्हते.”
तसेच पुढे तो म्हणाला की, “मी सतत २ दिवस त्या कफ सिरपचे सेवन केले आणि तिसऱ्या दिवशी माझी डोप चाचणी झाली होती. ज्यामध्ये मी पॉझीटिव्ह असल्याचे आढळून आले होते. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर मी लंडनच्या दिशेने रवाना झालो होतो आणि एक महिना रूमच्या बाहेर आलो नव्हतो.”
बीसीसीआयने डोपिंगविरोधी नियमांमुळे पृथ्वी शॉवर २०१९ मध्ये ८ महिन्यासाठी निर्बंध लावले होते. हा पृथ्वी शॉसाठी सर्वात कठीण काळ होता, असे त्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
तसेच येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. ज्यावेळी ही मालिका खेळवली जाईल, त्यावेळी संघातील वरिष्ठ खेळाडू इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सराव करण्यात व्यस्त असतील. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा संघ रवाना होऊ शकतो. या संघात पृथ्वी शॉला सलामी फलंदाजाची भूमिका मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट व रोहितला बाद करू शकतोस का?’ जिमी निशामने दिले ‘हे’ उत्तर