काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी लागली आहे. पोवार हे पुन्हा एकदा भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले असल्याची घोषणा गुरुवारी (१३ मे) करण्यात आली.
पोवार यांनी यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने २०१८ सालच्या टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने सलग १४ टी२० सामनेही जिंकण्याची करामत केली होती. पण २०१८ च्या महिला टी२० विश्वचषकानंतर मिताली राज आणि त्यांच्यातील वादामुळे अखेर ते प्रशिक्षकपदावरुन दूर झाले होते.
११ वर्षात ११ प्रशिक्षक, ४ प्रशिक्षकांना पुन्हा देण्यात आले प्रशिक्षकपद
रमेश पोवार यांना एकदा प्रशिक्षकपदावरून काढून टाकले असताना देखील त्यांंची पुन्हा निवड केली गेली आहे. २०१० मध्ये सुधा शाह यांनी भारतीय महिला संघाला २ वर्ष प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना हटवण्यात आले होते. केव्हीपी राव (२०१०), अंजू जैन (२०११-१३), तुषार आरोटे (२०१३) आणि पूर्णिमा राव (२०१४) यांना प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यानंतर सुधा शाह (२०१४), पूर्णिमा राव (२०१५- १७), तुषार आरोट (२०१७-१८), रमेश पवार (२०१८), डब्ल्यू.व्ही. रमण (२०१९-२१) यांना संधी देण्यात आली. आता पोवार परत आले आहेत. म्हणजेच गेल्या ११ वर्षात चार प्रशिक्षकांना दोनदा संधी देण्यात आली. तर सरासरी एका वर्षाच्या अंतराने भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक बदलण्यात आला आहे.
पुरुष संघात वाद झाल्यानंतर कुंबळेला मिळाली नाही दुसरी संधी
माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी २०१६-१७ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. परंतु भारतीय कर्णधार विराट कोहली सोबतच त्यांचे काहीतरी खटकले होते. शेवटी अनिल कुंबळे यांनी माघार घेतली. त्यानंतर रवी शास्त्री यांना भारतीय संघाची जबाबदारी देण्यात आली.
परंतु महिला क्रिकेटच्या बाबतीत हे उलट झाले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत वाद झाला असताना देखील रमेश पोवार यांना परत प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. येत्या जून महिन्यात भारतीय महिला त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शतक हुकलं पण किर्तीमान केला, इंग्लिश कर्णधाराच्या जबराट कामगिरीने विराटसेनेची चिंता शिगेला!