भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी काही दिवसांपूर्वीच माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल म्हटले होते की, सौरवला कर्णधारपदावर रहाण्याची इच्छा असायची आणि प्रत्येकाला स्वतःहून नियंत्रित करायचे होते. या वक्तव्यानंतर त्यांनी आता भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडबद्दलही काही धक्कादायक खुलासे केले आहे.
सौरव गांगुली यांना भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. द्रविड यांच्या नेतृत्वातच भारतीय संघाला 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता.
ग्रेग चॅपेल राहुल द्रविड यांच्या कर्णधारपदाबद्दल क्रिकेट लाइफ स्टोरीजच्या पॉडकास्टवर बोलताना म्हणाले की, राहुल द्रविडकडे भारतीय संघाला जगातील सर्वोत्कृष्ट संघ बनविण्याची दृष्टी होती, परंतु संघातील वरिष्ठ खेळाडूंनी त्यांचे म्हणणे स्विकारले नाही. ते म्हणाले की द्रविडने भारताला जगातील सर्वोत्कृष्ट संघ बनविण्यासाठी खरोखर प्रयत्न केले होते, परंतु त्यावेळी संघात प्रत्येकाने असा विचार केला नव्हता. केवळ संघात राहण्याकडे खेळाडूंचे लक्ष अधिक होते. त्यापैकी बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंनी त्याबाबीला विरोध केला होता.
चॅपेल पुढे म्हणाले की 2008 मध्ये अनुभवी खेळाडूंच्या विरोधामुळे सौरव गांगुलीचे संघात पुनरागमन झाले होते. ही बाब इतर ज्येष्ठ खेळाडूंनाही लागू होते. कोणालाही स्वत: ला बदलण्याची इच्छा नव्हती व संघातून बाहेरही जायचे नव्हते.
राहुल द्रविड यांनी 79 एकदिवसीय व 25 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. या दरम्यान भारताने एकूण 50 सामने जिंकले होते. द्रविड यांना त्यादरम्यान भारताचे संकटमोचक म्हटले जात असे. द्रविड यांनी भारतासाठी कसोटी व एकदिवसीय या दोन्ही प्रकारामध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळेच द्रविड यांना भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप २०२२ च्या क्वालिफायरसाठी भारतीय फुटबॉल संघ पोहचला दोहा येथे; सुनील छेत्रीचे पुनरागमन
दोन देशांसाठी खेळणारा क्रिकेटपटू झाला निवृत्त; भारताविरुद्ध मात्र मिळाला नाही एकही बळी