बुधवारी(10 जूलै) 2019 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारताला 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे पहिले 3 फलंदाज 10 चेंडूंच्या आत बाद झाले होते. असे असतानाही भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांना फलंदाजीची संधी मिळाली.
धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर सुनील गावसकर, सौरव गांगुली अशा दिग्गजांसह अनेकांनी टीका केली आहे.
पण संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समर्थन केले असून हा सर्व संघाचा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शास्त्री म्हणाले, ‘हा संघाचा निर्णय होता आणि हा खूप साधा निर्णय होता. कारण जर धोनी आधी फलंदाजीला आला असता आणि लवकर बाद झाला असता तर धावांचा पाठलाग करणे अवघड झाले असते.’
‘त्याच्या अनुभवाची आम्हाला नंतर गरज होती. तो सर्वोत्तम फिनिशर आहे आणि जर त्याचा त्याप्रमाणे उपयोग केला नसता तर ती चूक झाली असती. या निर्णयाबाबत सर्व संघाचा स्पष्ट विचार होता.’
या सामन्यात भारतीय संघाने 92 धावांवर 6 विकेट गमावल्यानंतर धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत चांगली लढत दिली होती. मात्र धोनी 50 धावा करुन धावबाद झाला तर जडेजा 77 धावा करुन झेलबाद झाला. त्यांनतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहली, युवराज सिंगने एबी डिविलियर्सला असा दिला पाठिंबा