मुंबई । रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिला सामना खेळला. त्याने जोरदार सुरुवात केली. एका षटकात दोन गडी बाद करून त्याच्या जुन्या संघाला अडचणीत आणले. पण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो जखमी झाला आणि तो पॅवेलियनला परतला. दिल्लीसाठी ही वाईट बातमी आहे. या सामन्याच्या काही तास अगोदर इशांत शर्मा जखमी झाला होता.
षटकातील शेवटच्या चेंडूवर फॉलो थ्रूमध्ये चेंडू थांबविल्यानंतर त्याच्या खांद्यावर दुखापत झाली. फिजिओ जेव्हा त्याला मैदानाबाहेर घेऊन जात होता, तेव्हा तो वेदनेन विव्हळत होता.
रविचंद्रन अश्विनने सहाव्या षटकातील पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर करुण नायर आणि निकोलस पुरानला बाद करुन किंग्स इलेव्हन पंजाबला दणका शानदार गोलंदाजीचा प्रारंभ केला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने करुण नायरला पृथ्वी शॉच्या हातून झेलबाद केले. यानंतर निकोलस पूरन चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले.
अशा परिस्थितीत अश्विनने 1 षटकात 2 धावा देत 2 गडी बाद केले आणि पंजाबला बॅकफूटवर ढकलले. मात्र, यानंतर शेवटच्या चेंडूवर तो जखमी झाला.
रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीविषयी अद्ययावत माहिती देताना श्रेयस अय्यर म्हणाला, “अश्विनची षटके महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे खेळ आमच्या बाजूने बदलला, पण ते टी 20 क्रिकेट आहे. अश्विन म्हणतो की, तो पुढील सामन्यासाठी सज्ज असेल, पण शेवटी फिजिओ निर्णय घेणार आहे. अक्षर पटेलदेखील मधल्या षटकांत शानदार गोलंदाजी केली होती. “