भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला त्याच्या दिलखुलास बोलण्याच्या स्वभावासाठी ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. या दौऱ्याची सुरुवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. तत्पुर्वी अश्विनने भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ चेतेश्वर पुजारा याला एक अनोखे आव्हान (चॅलेंज) दिले आहे. जर पुजाराने त्याचे आव्हान पूर्ण केले तर आपली अर्धी मिशी काढून टाकणार असल्याचे अश्विनने सांगितले आहे.
अश्विन भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याशी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर चर्चा करत होता. यावेळी बोलता-बोलता पुजाराचा विषय निघाला. पुजारा याला भारतीय संघाचा ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जाते. पुजारा मैदानावर अधिकतर संथ फलंदाजी करताना दिसतो. त्यामुळे त्याने हवेत जोरदार फटकेबाजी केल्याचे दृश्य क्वचितच पाहायला मिळते.
यावर अश्विनने राठोड यांना मजेशीर प्रश्न केला की, पुजाराने फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर हवेत फटका मारल्याचे भविष्यात आम्हाला कधी पाहायला मिळेल का?. “मी आजवर बऱ्याचदा पुजाराला फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर मोठे शॉट मारण्यास सांगितले आहेत. परंतु तो नेहमी काही-ना-काही कारण सांगून माझ्या या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करत असतो”, असे उत्तर प्रशिक्षक राठोड यांनी अश्विनच्या प्रश्नावर दिले.
यानंतर पुढे मजेत बोलताना अश्विनने राठोड यांच्यापुढे पुजाराला आव्हान दिले. तो म्हणाला की, “जर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत पुजाराने फिरकीपटू मोईन अली किंवा त्यांच्या संघातील कोणत्याही फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर खेळपट्टीच्या बाहेर जात हवेत शॉट मारला; तर मी माझी अर्धी मिशी काढून टाकेन. एवढेच नव्हे तर, तशाच अर्ध्या मिशीसह मी मैदानावर खेळण्यासाठी उतरले.”
अश्विनचे हे आव्हान ऐकून राठोड यांना हसू आवरले नाही. त्यांनी हे आव्हान अतिशय गमतीशीर आणि भन्नाट आहे, असे म्हटले. तसेच त्यांनी अपेक्षा केली आहे की, पुजारा अश्विनचे हे आव्हान स्विकारेल.
लवकरच सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फ्रेबुवारीपासून चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी हा सामना संपेल. त्यानंतर १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या मैदानावरच दुसरा कसोटी सामना पार पडले. २४ फेब्रुवारी आणि ४ मार्चपासून सुरु होणारे अखेरचे दोन कसोटी सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील.
तत्पुर्वी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने कसोटी मालिकेत २-० ने यजमान संघाचा व्हाईटवॉश केला आहे. २७ जानेवारी रोजी इंग्लंडचे खेळाडू भारत दौऱ्यासाठी उड्डाण भरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी
क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट
पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा