भारत विरुद्ध इंग्लंड संघांमधील पाच सामन्यांची टी२० मालिका सध्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने प्रवेश दिला जात होता. मात्र आता गुजरातमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता उर्वरित सामने बंद दाराआड खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “होय, उर्वरित मालिका बंद दाराआड खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाहत्यांची आणि खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय झाला आहे. सुरक्षिततेला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणे, आवश्यक आहे.”
दरम्यान, देशभरात गेले काही महिने उतरणीला लागलेला कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल दिवसभरात देशात एकूण २५,३२० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. अशा परिस्थितीत ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती देखील धोक्याला आमंत्रण देणारी ठरली असती. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या:
राजकारणापासून समाजसेवेपर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी
शानदार विजयानंतर विराटसेनेच्या आनंदावर विरजण, या कारणामुळे आयसीसीने ठोठावला दंड