भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या संकटात इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगामही सापडला आहे. आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु असतानाच कोरोना व्हायरसचा अचानक संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे ही स्पर्धा २९ सामन्यांनतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएल कमीटीने घेतला. हा हंगाम स्थगित झाल्यानंतर उर्वरित ३१ सामन्यांचे काय हा मोठा प्रश्न उभा आहे.
सध्या वेगवेगळ्या देशांतून उर्वरित आयपीएल २०२१ हंगाम आयोजित करण्याच्या ऑफर येत असल्याचे समोर येत आहे. नुकतेच अशीही चर्चा होती की इंग्लंडमधील कौऊंटी ग्रुपने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले असून यात उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचे आयोजन करण्याबद्दल इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
ही चर्चा सुरु असतानाच इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसनने म्हटले आहे की आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन सप्टेंबरमध्ये इंग्लंडला व्हावे. यासाठी त्याने त्याची कारणेही सांगितली आहेत.
पीटरसनने बेटवेसाठी लिहिलेल्या आपल्या स्तंभात म्हटले आहे की, ‘मी पाहिले की सप्टेंबरमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन युएईमध्ये करण्याबद्दल लोक चर्चा करत आहेत. पण मला वाटते की या सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्ये व्हायला पाहिजे. इंग्लंड आणि भारत संघात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेनंतर काही वेळ असणार आहे. तसेच भारताचे दिग्गज खेळाडू त्यावेळी तिथेच असणार आहेत. त्याचबरोबर इंग्लंडचेही दिग्गज खेळाडू उपलब्ध असतील.’
भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडला जाणार आहे. कारण भारताला इंग्लंडमध्ये जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये बरेच स्टार खेळाडू इंग्लंडमध्येच असणार आहेत.
पीटरसन पुढे म्हणाला, ‘सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून अखेरपर्यंत इंग्लंडमधील वातावरण सर्वात चांगले असते. मँचेस्टर, लीड्स, बर्मिंगघम आणि लंडनमधील २ मैदानांचा सामन्यांच्या आयोजनासाठी उपयोग होऊ शकतो. तसेच चाहत्यांच्या उपस्थितीचीही दाट शक्यता आहे. क्रिकेटसाठी ही गोष्ट चांगली असेल. आयपीएलचे आयोजन यापूर्वी युएई आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झाले आहे आणि मला वाटते की आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामने घेण्यासाठी इंग्लंड सर्वोत्तम पर्याय असेल.’
असे असले तरी अजून आयपीएलच्या आयोजनाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हे निर्णय येत्या काही महिन्यांत घेतले जातील. सध्या तरी अशी चर्चा आहे की टी२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये काही काळ रिकामा असल्याने त्यावेळी उर्वरित आयपीएल २०२१ चे आयोजन होऊ शकते. पण त्यासाठी अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांशीही चर्चा करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनामुळे भारतीय क्रीडासृष्टीतील दोन तारे निखळले; एकाच दिवशी झाले दोन ऑलिंपिक सुवर्णपदकवीरांचे निधन
भारतीय क्रिकेट जगताला धक्का! कोरोनाने घेतला दिग्गज भारतीय स्कोररचा बळी