मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे क्रिकेट खेळाडू हे सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट फॅन्स आणि खेळाडूंशी संवाद साधत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा इतर सहकाऱ्यांशी इन्स्टाग्रामवर लाइव्ह बोलत होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हे दोघे एकमेकांसोबत लाइव्ह संवाद साधत नव्हते. दोघांमध्ये अजूनही वाद सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
कोहलीने इंग्लंड माजी कर्णधार केविन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर संवाद साधत होता. यासोबत एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो संवाद साधत होता.
दुसरीकडे रोहित शर्माने मोहम्मद शमी, हरभजन सिंह, जसप्रीत बुमरा, डेविड वॉर्नर यांच्यासह अन्य खेळाडूंशीही संवाद साधत होता.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर रोहित आणि विराट यांच्यामध्ये वाद सुरू झाला. ड्रेसिंग रूममध्येही रोहित आणि विराट यांचा गट पडल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र दोघांनीही आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी खेळाडूंचा वाद सोडवण्यासाठी बीसीसीआयचे अधिकारी इंग्लंडमध्येही पोचले होते. काही दिवसांपूर्वी रोहित आणि विराट यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकाला अनफॉलो केले होते.
बीसीसीआय एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यांसाठी रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्याच्या विचारात होती तर कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व विराट कडे देण्यात यावे असा विचार पुढे आला होता. मात्र प्रत्यक्षात त्याच्यावर कार्यवाही झाली नाही. त्यानंतर दोघांत वाद सुरू झाला असल्याचे समजते.