रांची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून (19 ऑक्टोबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या सामन्यात आज दुसऱ्या सत्राखेर पर्यंत भारताने 52 षटकात 3 बाद 205 धावा केल्या आहेत.
भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी केली असून त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील एकूण सहावे शतक आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील एकूण तिसरे शतक आहे.
त्याने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे याच मालिकेतून त्याने कसोटी सलामीवीर म्हणूनही खेळायला सुरुवात केली.
त्यामुळे तो एका कसोटी मालिकेत 3 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा दुसराच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याआधी असा विक्रम सुनील गावस्करांनी केला होता. विशेष म्हणजे गावस्करांनी तीनवेळा असा कारनामा केला आहे.
त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4 शतके केली होती. त्यानंतर त्यांनी 1977-78 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3 शतके केली होती. तसेच त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्धच 1978-79 मध्ये 6 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4 शतके केली होती.
रोहितने सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर 149 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार मारले.
त्याच्याबरोबर सध्या अजिंक्य रहाणे फलंदाजी करत असून त्याने अर्धशतक पूर्ण करताना 114 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या आहेत.