भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर भारतीय संघातून दुखापतीमुळे बाहेर आहे. रोहित गेल्या महिन्यातच पुर्णपणे सावरला होता व तो फिटनेस चाचणीही देणार होता परंतु कोरोना व्हायरस या वैश्विक महामारीमुळे भारतात लाॅकडाऊन सुरु झाले व सर्व क्रीडा स्पर्धा एकतर रद्द किंवा स्थगित झाल्या.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज असलेला रोहित गेले काही वर्ष तुफान फाॅर्ममध्ये आहे. याच सगळ्या गोष्टींमुळे रोहितला लाॅकडाऊनंतर अनेक विक्रम करण्याची संधी आहे. त्यातील काही ठळक विक्रम-
वनडेत १० हजार धावा
रोहितच्या नावावर सध्या २२४ सामन्यांत ४९.२७च्या सरासरीने ९११५ धावा आहेत. रोहितला वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी आता ८८५ धावांची गरज आहे. त्याने या धावा पुर्ण केल्या तर अशी कामगिरी करणारा तो जगातील १५ वा तर भारतातील ६वा फलंदाज ठरेल. रोहितचा सध्याचा फाॅर्म पाहता त्यासाठी ही नक्कीच मोठी गोष्ट नाही.
सर्वाधिक वनडे शतकांमध्ये तिसरे स्थान
एकेवेळी संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडणारा रोहित पुढे वनडेत २९ शतके करेल, असे फारच कमी चाहत्यांना वाटले असेल. २२४ वनडेत रोहितच्या नावावर २९ शतके असून तो तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाॅटींगपेक्षा (३०) केवळ एका शतकाने मागे आहे. रोहितने येत्या काळात वनडेत जर दोन शतके केली तर सचिन तेंडूलकर (४९), विराट कोहली (४३) नंतर तो तिसऱ्या स्थानावर विराजमान होईल.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०२ सामन्यात ३२.६२च्या सरासरीने २७७३ धावा केल्या आहेत. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर (२७९४) दुसरा आहे. या दोन खेळाडूंमध्ये या अव्वल क्रमांकासाठी मोठी स्पर्धा आहे. रोहितचे याही विक्रमाकडे नक्कीच लक्ष असणार.
सर्व प्रकारच्या ट्वेंटी- ट्वेंटी सामन्यात ९ हजार धावांचा टप्पा
रोहितने सर्व प्रकारच्या ३२८ ट्वेंटी- ट्वेंटी सामन्यात ३२.२४च्या सरासरीने ८६४२ धावा केल्या आहेत. तर त्याच्यापुढे भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली असून विराटने ८९०० धावा केल्या आहेत. या प्रकारात सर्वाधिक धावा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने केल्या आहेत. त्याने ४०४ सामन्यात १३२९६ धावा केल्या आहेत. रोहितला या प्रकारातही ९ हजार धावांचा टप्पा पार करण्याची मोठी संधी आहे. या वर्षी जर आयपीएल व टी२० विश्वचषक झाले असते तर रोहितने हा कारनामा याचवर्षी नक्कीच केला असता.