मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सोमवारी (28 सप्टेंबर) सुपर ओव्हरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने सुपर ओव्हरमध्ये विजयी धावा केल्या आणि आयपीएलच्या 13व्या हंगामातील दुसरा विजय नोंदविला. तसेच पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावरून तिसर्या स्थानावर झेप घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलामीवीर देवदत्त पडिक्कल (54), त्याचा संघ सहकारी ऍरॉन फिंच (52) आणि एबी डिविलियर्स (नाबाद 55) आणि शिवम दुबेच्या तुफानी नाबाद 27 धावांच्या मदतीने 20 षटकांत 3 बाद 201 धावा केल्या. प्रत्त्युत्तरात ईशान किशनच्या (99) आणि कायरन पोलार्डच्या नाबाद (60) धावांच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 5 बाद 201 धावा केल्या. सामना बरोबरीत सुटला आणि निर्णयासाठी सुपर ओव्हर खेळावी लागली.
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील हा दुसरा सुपर ओव्हरचा सामना होता. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा थोडा निराश झाला होता. त्याने ईशान किशनचे खूप कौतुक केले. 99 धावा करूनही ईशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यास का पाठविले नाही, याचे कारण त्याने सांगितले आहे.
सामन्यानंतर मुलाखतीदरम्यान रोहित शर्माने आपल्या पराभवाबद्दल सविस्तरपणे सांगितले आणि म्हणाला की, “क्रिकेटसाठी हा एक शानदार खेळ होता. जेव्हा आम्ही फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा आम्ही मुळीच या सामन्यात नव्हतो. परंतु तरीही आम्हाला माहित होते की आमच्याकडे असलेल्या फलंदाजीच्या सामर्थ्याने आपण 200 धावांचा पाठलाग करू शकतो. जोपर्यंत पोलार्ड आहे तोपर्यंत काहीही होऊ शकते, ईशानदेखील अतिशय चमकदार फलंदाजी करत होता.”
तो पुढे म्हणाला, “आम्ही किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवले नाही, कारण तो खूप थकला होता. आम्हाला वाटले की, आम्ही त्याला पाठवू शकू पण माझे म्हणणे म्हणजे धावांसाठी तुम्हाला तुमच्या नशिबाची गरज आहे. आम्हाला सुपर ओव्हरमध्ये विकेट घेण्याची गरज होती. पण दुर्दैवाने एक चौकार निघून गेला. या सामन्यातून बर्याच सकारात्मक गोष्टी घडून आल्या.”