रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आज द्विशतकी खेळी केली आहे.
कालपासून सुरु झालेल्या या सामन्यात त्याने षटकार ठोकत 250 चेंडूत 28 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 200 धावांचा टप्पा पार केला आहे. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक आहे.
तसेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीमध्ये 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा चौथाच भारतीय फलंदाज आहे. याआधी असा पराक्रम विरेंद्र सेहवाग, मयंक अगरवाल आणि विराट कोहलीने केला आहे.
विशेष म्हणजे अगरवाल आणि कोहलीनेही सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतच हा कारनामा केला आहे. अगरवालने या मालिकेतील पहिल्या कसोटीत 215 धावांची खेळी केली होती. तर कोहलीने दुसऱ्या कसोटीत नाबाद 254 धावांची खेळी केली होती. त्यापूर्वी सेहवागने 2008मध्ये 319 धावांची त्रितकी खेळी केली होती.
रोहितने सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत अजिंक्य रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारीही केली आहे. रहाणे 115 धावांवर बाद झाला.