भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी(१० जून) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या संपूर्ण दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघात पुण्याच्या २४ वर्षीय ऋतुराज गायकवाडची निवड झाली आहे.
एका अर्थाने ऋतुराजला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. ऋतुराजने आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमीयर लीगमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली होती.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराजची शानदार कामगिरी
साल २०१६ पासून ऋतुराज महाराष्ट्र संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने २०१६ ला वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्राकडून रणजीमध्ये पदार्पण केले होते. ऋतुराज महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत.
तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४७.८७च्या सरासरीने ५९ सामन्यात २६८१ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ४६ टी२० सामन्यात १३३७ धावा केल्या आहेत. तसेच तो भारत अ संघाकडूनही खेळला आहे. ऋतुराज २०१९ देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया बी व दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्ल्यू संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने भारतीय अ संघाकडून पदार्पणाचा सामना इंग्लंड लायन्सविरुद्ध (इंग्लंड अ) खेळला.
भारत अ संघाकडून खेळताना ऋतुराजने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दौऱ्यात सर्वांना प्रभावित केले होते. श्रीलंका अ आणि वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध जवळजवळ १०० पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या होत्या.
ऋतुराजची आयपीएल कारकिर्द –
गेले २ वर्षे ऋतुराज चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. पण त्याला २०१९ च्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र २०२० मध्ये त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा फायदा घेत त्याचे नाणे खणखणीत वाजवले.
आयपीएल २०२० हंगामात चेन्नईकडून त्याने शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला होता. त्याने चेन्नईकडून ६ सामने खेळताना ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या होत्या. ऋतुराजचे आयपीएल २०२१ मधील प्रदर्शनही चांगले झाले. हा हंगाम स्थगित होण्यापूर्वी ऋतुराजने ७ सामन्यात २ अर्धशतकांसह १९६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला २००७ टी२० विश्वचषकावेळी कर्णधारपदाची आशा होती, पण धोनी कर्णधार झाला’, युवराजचा खळबळजनक खुलासा
मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होऊ शकते ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात; पुढील महिन्यात होणार घोषणा