इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांची गणना मजबूत संघ म्हणून केली जाते. मुंबई संघ आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. हा संघ आत्तापर्यंत पाच वेळा अंतिम सामना खेळला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा जेतेपद मिळविले आहे. या संघाने 8 वेळा अंतिम फेरी गाठली आहे.
2010 मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडुलकर मुबंई इंडियन्स संघाचा कर्णधार होता. सचिन हा नेहमी त्याच्या संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु या सामन्यादरम्यान सचिनचा राग अनावर झाला होता.
त्या सामन्यात फिरकीपटू आर अश्विनने पहिले षटक निर्धाव टाकले. पुढच्या षटकात डग बॉलिंजरने शिखर धवनला बाद केले. यानंतर डावखुरा फलंदाज अभिषेक नायर सचिन तेंडुलकरला साथ देण्यासाठी मैदानात आला. दोघांनी मिळून 11 षटकांत 67 धावा केल्या आणि 66 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, धोनीने फिरकीपटू सुरेश रैनाला 12 वे षटक टाकण्यास सांगितले. नायर रैनाच्या पहिल्याच चेंडूवर धाव घेऊ शकला नाही. पुढचा चेंडू त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, दुसर्या बाजूला सचिनने नायरला परत जाण्यास सांगितले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि धोनीने त्याला धावचीत केले होते.
नायर बाद झाल्यावर सचिनने त्याचा संयम गमावला होता. त्याने रागाने आपली बॅट जमिनीवर आपटली. कदाचित सचिनला असे वाटले असेल की आयपीएल करंडक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले.
नायर बाद झाल्यावर मुंबई संघ 100 धावांवर त्याचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्या सामन्यात सचिनने 45 चेंडूत 48 धावा केल्या होत्या. नायर 26 चेंडूंत 27 धावा करून बाद झाला होता. या दोघांव्यतिरिक्त अंबाती रायुडू ( 14 चेंडूत 21 धावा) आणि कायरान पोलार्ड (10 चेंडूत 27 धावा) यांना दुहेरी आकडा गाठता आला.
डाव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू शादाब जकाती या सामन्यात धोनीचा ट्रम्प कार्ड होता. जकातीने 3 षटकांत 26 धावा देऊन 2 (सचिन तेंडुलकर आणि सौरभ तिवारी) बळी घेतले होते. 168 या धावसंख्येचा पाठलाग करतांना मुंबई संघ 20 षटकांत 9 बाद 146 धावा करू शकला आणि चेन्नईला प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनण्यात यश आले होते.