आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात्तम यष्टीरक्षक म्हणून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव घेतले जाते. यष्ट्यांमागे आपल्या जबरदस्त चपळाईने फलंदाजांना बाद करण्यात त्याचा हातखंडा होता. मात्र, आकडेवारीचा विचार केल्यास धोनी काहीसा मागे दिसतो. धोनी आकडेवारीत ज्या दिग्गज यष्टीरक्षकांच्या मागे आहे त्यापैकी एक असलेल्या श्रीलंकेच्या कुमार संगकारा याने आजच्या दिवशी (२४ ऑगस्ट) २०१५ साली आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दुर्दैवाने त्याच्या अप्रतिम कारकिर्दीची अखेर पराभवाने झाली. आज आपण धोनी ज्या बाबतीत संगकाराच्या मागे आहेत
त्या आकडेवारीबाबत जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय सामने आणि धावा
कुमार संगकाराने आपल्या कारकिर्दीत १३४ कसोटी आणि ४०४ वनडे सामने तर, धोनीने ९० कसोटी आणि ३५० वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. संगकाराने कसोटीत १२,४०० धावा आणि वनडेमध्ये १४,२३४ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे धोनीच्या बॅटमधून कसोटीत ४८७६ व आणि वनडेमध्ये १०७३३ धावा केल्या होत्या. संगकाराने कसोटीत ५७.४० तर धोनीने ३८.०९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
झेल आणि शतके
संगकाराने वनडे सामन्यात ४०२ तर, धोनीने ३२१ झेल घेतले आहेत. संगकाराची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ३१९ अशी आहे. तर, धोनीच्या २२४ धावा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक आहेत. श्रीलंकन दिग्गजाने कसोटीत ३८ आणि वनडेमध्ये २५ शतके केली आहेत. धोनीने ६ कसोटी आणि १० वनडे शतके झळकावली होती. संगकाराची टी२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या ७८ असून, धोनीने टी२० मध्ये सर्वाधिक धावसंख्या ५६ अशी नोंदवली आहे.
असा रंगला संगकाराचा अखेरचा सामना
पी.सारा ओव्हल मैदानावर २० ते २४ ऑगस्ट दरम्यान खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९३ धावा केलेल्या. केएल राहुलने १०८, कर्णधार विराट कोहलीने ७८ आणि रोहित शर्माने ७९ धावा बनविलेल्या. यष्टीरक्षक साहाने ५६ धावांचे योगदान दिले होते. श्रीलंकेकडून रंगना हेराथने चार बळी मिळवलेले. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ ३०६ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने १०२, लाहिरू थिरिमानेने ६२ आणि कौशल सिल्वाने ५१ धावांचे योगदान दिलेले. संगकारा फक्त ३२ धावा करू शकला. भारताकडून अमित मिश्राने चार बळी मिळवले.
भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने शतक व मुरली विजयने अर्धशतक झळकावत यजमान श्रीलंकेपुढे विजयासाठी ४१३ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. रविचंद्रन अश्विनने पाच तर, अमित मिश्राने तीन बळी घेऊन श्रीलंकेचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आला. अशा प्रकारे भारतीय संघाने या सामन्यात २७८ धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व संघ सहकाऱ्यांच्या सह्या असलेली जर्सी संगकाराला भेट म्हणून दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
चौदा वर्षापूर्वी सचिन झाला होता नर्वस नाईंटीजचा शिकार, भोवलेला पंचांचा चुकीचा निर्णय
आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास
उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स