इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानात सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी देखील या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी केली. ज्यामुळे इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दमछाक करून सोडली. मात्र, लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यासारखेच या कसोटी सामन्यात देखील शेवटच्या फळीतील फलंदाज भारतीय संघासाठी तारणहार ठरले. यंदा शार्दुल ठाकुरने शेवटच्या फळीत येऊन कमालीची फलंदाजी केली.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, यातही भारतीय फलंदाज अपयशी ठरले. यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. मात्र तोही ५० धावांवर ऑली रोबिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ज्यानंतर एकामागे एक भारतीय फलंदाज बाद होत राहिले.
मात्र, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शार्दुलने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केवळ ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. ज्यामुळे भारतीय संघाला चांगलीच मदत झाली. शार्दुलच्या या अर्धशतकी खेळीसह शार्दुलने इंग्लंडमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केला.
शार्दुलने इयान बॉथम यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. बॉथम यांनी ३५ वर्षांपूर्वी १९८६ साली इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीयांच्या यादीत शार्दुल ठाकूर दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला. भारताकडून कसोटीमध्ये सर्वात जलद अर्धशतकी खेळी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पाकिस्तान विरुद्ध १९८२ साली केले होते. तेव्हा त्यांनी केवळ ३० चेंडूमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे या यादीतील शीर्षाच्या ५ खेळाडूंमध्ये ३ वेळा कपिल देव यांचे नाव आहे.
यानंतर वीरेंद्र सेहवागने इंग्लंड विरुद्ध २००८ साली ३२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. नंतर कपिल देव यांनी १९७८ साली पाकिस्तान विरुद्ध त्यांनी ३३ चेंडूत अर्धशतक केले होते. तर पुन्हा कपिल देव यांनी इंग्लंड विरुद्ध १९८२ साली ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.
दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघाने शार्दुल ठाकुरच्या ५७ धावा आणि विराट कोहलीच्या ५० धावांच्या जोरावर १९१ धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना क्रिस वोक्सने दमदार पुनरागमन करत ४ विकेट्स घेतल्या. आली रॉबिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
भारताकडून सर्वात जलद कसोटीत अर्धशतक करणारे क्रिकेटपटू
३० चेंडू – कपिल देव (विरुद्ध पाकिस्तान, १९८२)
३१ चेंडू – शार्दुल ठाकूर (विरुद्ध इंग्लंड, २०२१)
३२ चेंडू – विरेंद्र सेहवाग (विरुद्ध इंग्लंड, २००८)
३३ चेंडू – कपिल देव (विरुद्ध पाकिस्तान, १९७८)
३३ चेंडू – कपिल देव (विरुद्ध इंग्लंड, १९८२)
महत्त्वाच्या बातम्या –
–जिद्दीला सलाम! गुडघा रक्तबंबाळ झाल्यानंतरही अँडरसनने दाखवले खेळण्याचे धाडस, फोटो व्हायरल
–तेंडुलकरनंतर आता पुजारा ठरतोय जेम्स अँडरसनचा नेहमीचा गिऱ्हाईक, ‘इतक्या’ वेळेस केलंय बाद
–वनडे कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या अन् खालच्या फळीत खेळणारे ‘हे’ भारतीय क्रिकेटर, पुढे बनले अव्वल सलामीवीर