इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४९वा सामना बुधवारी (०४ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईला १३ धावांनी पराभवाचा धक्का बसला. चेन्नईने यासह हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ७ सामने गमावले आहेत. दुसरीकडे, त्यांना फक्त ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. ४९व्या सामन्यात बेंगलोरने चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ८ विकेट्स गमावत १६० धावाच करता आल्या. या पराभवाचं खापर कर्णधार एमएस धोनीने फलंदाजांवर फोडले आहे.
एमएस धोनीने (MS Dhoni) सांगितले की, “चांगल्या सुरुवातीनंतरही आम्ही नियमित अंतराने विकेट्स गमावले, याचाच फटका आम्हाला सहन करावा लागला.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही बेंगलोरला १७०च्या आसपास रोखले होते. मला वाटले की, दुसऱ्या डावात खेळपट्टी ही फलंदाजांसाठी चांगली होईल. आम्ही फलंदाजीत चांगली सुरुवात केली. सर्वकाही आमच्या योजनेनुसारच जात होते. मात्र, आमच्या फलंदाजांनी निराश केले. आव्हानाचा पाठलाग करणे हा आकलनाचा खेळ आहे. आमच्या फलंदाजांना हेच जमलं नाही. जेव्हा तुम्ही आव्हानाचा पाठलाग करता, तेव्हा तुम्हाला माहिती असते की, तुम्हाला किती धावांची आवश्यकता आहेत. तसेच, त्यावेळी तुम्ही शॉट्स मारण्याऐवजी परिस्थितीनुसार खेळता.”
चेन्नईने हंगातील १० सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत. यासह ते ६ गुण मिळवत गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, बेंगलोर संघ या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वात बेंगलोरने ११ सामने खेळले आहेत. त्यातील ६ सामन्यात विजय मिळवत बेंगलोर १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
‘गुणतालिकेतील स्थानाऐवजी आपल्या चुकांवर लक्ष देण्याची गरज’
बेंगलोरविरुद्धच्या पराभवानंतर धोनीने त्याच्या संघाला गुणतालिकेतील स्थानाऐवजी आपल्या चुकांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हणले. चेन्नईकडून बेंगलोरच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेवॉन कॉनवेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३७ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकार मारत ५६ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड २८ धावा करून तंबूत परतला. आपल्या संघातील चुकांविषयी बोलताना धोनी म्हणाला की, “आम्हाला हे पाहत राहिले पाहिजे की, नेमकं चुकलं कुठे. तुम्ही गुणतालिकेकडे पाहून चिंताग्रस्त होऊ शकता. आम्ही गुणतालिकेत कोणत्या स्थानावर आहोत, यापेक्षा आम्ही आमच्या चुकांवर लक्ष देत आहोत.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बेंगलोरच्या डावाविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना त्यांच्याकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे ३८ आणि ३० धावा केल्या. तसेच, दिनेश कार्तिकने २६, तर रजत पाटीदारने २१ धावा केल्या. बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने गोलंदाजी करताना चेन्नईच्या ३ फलंदाजांना तंबूत धाडलं. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
आता साखळी सामन्यांमधील चेन्नईचे फक्त ४ सामने शिल्लक राहिले आहेत. अशात चेन्नईने हे चारही सामने जिंकले, तरीही त्यांचे गुण १४ होतील. हे गुण त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मदत करू शकत नाहीत. दुसरीकडे, बेंगलोरला अजून ३ सामने खेळायचे आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माझा होशील का? चेन्नई-बेंगलोर सामन्यात मुलीने सर्वांसमोर केले मुलाला प्रपोज, Video तुफान Viral
मोईन अलीचा मॅजिक बॉल, बॅट- पॅडच्या मधून जात चेंडूने उडवल्या यष्ट्या; खुद्द विराटही पाहातच राहिला
सीएसकेची वाढली डोकेदुखी! कॅच घेण्याच्या नादात जडेजाने स्वत:लाच केले जखमी, मैदानावर लागला विव्हळू