भारतीय संघाने मागच्या काही वर्षांमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे. परंतु संघाला त्यांचे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद जिंकून बरीच वर्ष झाली आहेत. अशात चाहत्यांना देखील भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचे जेतेपद कधी जिंकणार असा प्रश्न पडला आहे. अशात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी याबाबतीत त्यांचे मत मांडले आहे. त्यांच्या मते २०२२ ते २०३१ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयसीसी स्पर्धांपैकी काहींमध्ये भारत नक्कीच विजेतेपद मिळवेल.
भारताने आपले शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. त्यावेळी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली. त्यानंतर २०१४ टी२० विश्वचषक, २०१५ वनडे विश्वचषक, २०१६ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ वनडे विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
सौरव गांगुलींनी एका मुलाखतीत बोलताना आयसीसी ट्रॉफीच्या पडलेल्या दुष्काळाबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिला आहे. गांगुली म्हणाले की, “वर्ष २०२२ ते २०३१ पर्यंत प्रत्येक वर्षी एका स्पर्धेचे आयोजन होईल. मला विश्वास आहे की, भारतीय संघ यातील काहींमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होईल. जरी २०१९ च्या वनडे विश्वचषकात त्यांना उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला असेल तसेच २०२१ च्या टी२० विश्वचषकात संघाचा प्रवास ग्रुप स्टेजवरतीच थांबला असेल. मात्र, इतर भारतीय चाहत्यांप्रमाणे मला देखील विश्वास आहे की, येत्या काळात आपण काही स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होऊ.”
“भविष्यवाणी करणे अवघड आहे. आपल्याकडे चांगला संघ सोबतच राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक आणि रोहित शर्मासारखा मर्यादित षटकांचा कर्णधार देखील आहे. क्रिकट सांघिक खेळ आहे आणि यामध्ये प्रशिक्षक आणि कर्णधारासोबत बाकी खेळाडूंना मिळून प्रदर्शन करायचे असते. ज्यामुळे संघाला यश मिळते. ही गोष्ट करून आयसीसी ट्रॉफीच्या पडलेल्या दुष्काळाला येत्या काळाता संपवायचे आहे.” असे गांगुली पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, भारतीय संघात सध्या मोठे बदल झाले आहेत. विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर, बीसीसीआयने वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी देखील रोहित शर्मावर विश्वास दाखवला आहे. तसेच टी२० विश्वचषकानंतर राहुल द्रविडच्या रूपात संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. अशात आगामी काळात चाहत्यांना देखील संघाकडून अधिक चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘ऋतूराजला आता टीममध्ये घ्या, २८व्या वर्षी घेऊन काय करणार?’ ‘या’ दिग्गजाचा मोलाचा सल्ला
रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
टी२० विश्वचषक सामन्यात नाणेफेकीवेळी विराटसोबत काय बोलणं झालं? बाबर आजमचा खुलासा