सध्याच्या भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी अनेक खेळाडू आटोकाट प्रयत्न करताना दिसून येत आहेत. युवा संघापासून प्रतिभावान खेळाडू आपल्या कामगिरीच्या जोरावर, भारतीय संघाचे दार वाजवत आहेत. १९ वर्षाखालील मुलांच्यां क्रिकेट विश्वचषकातून आतापर्यंत भारतीय संघाला बरेच दिग्गज खेळाडू मिळाले आहेत. मोहम्मद कैफ, युवराज सिंग यांच्यासोबतच अंबाती रायडू, मनीष पांडे, शिखर धवन, विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, पृथ्वी शॉ हे खेळाडू युवा विश्वचषकात चमकदार कामगिरी करूनच प्रकाशझोतात आले होते.
याच वर्षी झालेल्या युवा विश्वचषकात देखील यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई व कार्तिक त्यागी या नव्या चेहऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. यांच्यासोबतच एक खेळाडू गेली दोन वर्ष भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे. तो म्हणजे पंजाबचा अष्टपैलू अभिषेक शर्मा.
२०१५-१६ च्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये अभिषेकने पंजाबच्या सोळा वर्षाखालील संघाला एक हाती विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने स्पर्धेत फलंदाजी केलेल्या १२ डावांमध्ये १२०० धावा फटकावल्या होत्या. त्या दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या खेळाडूपेक्षा तब्बल ४५० अधिक होत्या. या स्पर्धेत त्याची सरासरी १०९.७ इतकी लाजवाब होती. गोलंदाजीत सुद्धा त्याने ५७ बळी मिळवले आणि स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला.
अभिषेक शर्माने श्रीलंकेत झालेल्या २०१६ युवा आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी नेतृत्व करणारा तो सर्वात युवा कर्णधार ठरला होता. भारताने ती स्पर्धा एकही पराभव न स्वीकारता जिंकली. याच सोबत घरच्या मैदानावर झालेल्या इंग्लड युवा संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील त्याने संघाचे नेतृत्व केले. या मालिकेत सुद्धा भारताने ३-१ ने अजिंक्यपद पटकावले.
त्याचा आदर्श असणाऱ्या युवराज सिंग प्रमाणेच अभिषेकला खरी ओळख मिळाली ती २०१८ मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने चौकार षटकारांची बरसात करत १५० धावा व ९ बळी आपल्या नावे केले. त्याच वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल संघाने ५५ लाखाची बोली लावत त्याला आपल्या संघात निवडले.
आयपीएलमधील बहुप्रतिक्षित पदार्पण त्याने त्याच वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत, टीम साऊदी, उमेश यादव, युजवेंद्र चहल, कोरी अँडरसन, मोहम्मद सिराज यासारख्या गोलंदाजांची पिसे काढत त्याने अवघ्या १९ चेंडूत नाबाद ४६ धावा तडकावल्या. १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू होण्यापासून तो थोडक्यात चुकला.
२०१९ आयपीएलपूर्वी दिल्लीने त्याला सनरायझर्स हैदराबादसोबत ट्रेड केले. त्या हंगामात नियमित संधी न मिळाल्याने तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. मात्र, २०१९ मुश्ताक अली ट्रॉफी व २०२० डी. वाय पाटील टी२० स्पर्धा त्याने सलामीवीर म्हणून गाजवल्या. दोन स्पर्धात मिळून त्याने ४०० हून अधिक धावा १५० च्या स्ट्राईक रेटने काढल्या.
आता, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी, कृणाल पांड्या व रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा अभिषेक, यूएईमध्ये होणारा आयपीएलचा तेरावा हंगाम सनरायझर्स हैदराबादसाठी फिनिशर म्हणून गाजवण्यास सज्ज झाला आहे.
ट्रेंडिंग लेख –
वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज
३ असे भारतीय दिग्गज, ज्यांनी केल्यात कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर
महत्त्वाच्या बातम्या –
हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ
दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…