२ एप्रिल २०११ ला भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. या विश्वविजेतेपदाला गुरुवारी ९ वर्षे पूर्ण झाली. यावेळी सुरेश रैनाने अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच त्याने अंतिम सामन्यात धोनीने फलंदाजी क्रमवारीत बढती घेऊन ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यामागील कारणही सांगितले.
२०११ च्या अंतिम सामन्यात भारताने २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागची विकेट लवकर गमावली होती. पण नंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने भारताचा डाव सांभाळला होता. पण विराटही ३५ धावांवर बाद झाल्यावर धोनी युवराज सिंग ऐवजी ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.
याबद्दल पीटीआयशी बोलताना रैना म्हणाला, त्यावेळी श्रीलंका संघात मुथय्या मुरलीधरन होता. त्याला धोनी चांगला खेळू शकत असल्याने तो ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.
रैना म्हणाला, ‘धोनीची बॉडी लँग्वेजपाहून मी वाटले होते की तो आपल्याला विश्वचषक जिंकून देईल. धोनी त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या युवराजऐवजी ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. तो मोठा निर्णय होता. धोनीने त्यावेळचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना सांगितले होते की तो मुरलीधरनला चांगल्याप्रकारे खेळू शकतो. त्यामुळे तो फलंदाजीला जाईल. मला अजूनही सर्व लक्षात आहे.’
५ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या धोनीने गंभीरबरोबर १०९ धावांची भागीदारी केली होती. गंभीर ९७ धावांवर बाद झाल्यावर त्याने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी सांभाळत नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. धोनीने ४९ व्या षटकात षटकार ठोकत विश्वचषकावर भारताचे नाव कोरले होते. धोनीला त्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
त्याचबरोबर रैनाने गंभीरने केलेल्या ९७ धावांच्या खेळीचेही कौतुक केले आहे. त्याचबरोबर या संपूर्ण विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत महत्त्वाचा वाटा उचललेल्या युवराज सिंगलाही रैनाने विश्वचषक भारताला जिंकून देण्याचे श्रेय दिले आहे. तसेच रैनाने या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या झहिर खानचेही कौतुक केले.
ट्रेंडिंग घडामोडी –
आणि एमएस धोनी पुन्हा झाला कर्णधार
वैतागलेला चहल म्हणतो, मुंबई इंडियन्स, तुम्ही स्वप्न पाहत बसा