मुंबई। जे यश चिपळूणच्या मातीत मिळविता आले नव्हते ते यश प्रभादेवीच्या मॅटवर संपादण्यासाठी राज्यातील सारेच अव्वल जिल्हा कबड्डी संघ “मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धा” म्हणून आधीच प्रसिद्ध झालेल्या विशेष निमंत्रित जिल्ह्यांच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
मुंबईची कबड्डीनगरी असलेल्या प्रभादेवीतील दिग्गज कबड्डी आयोजक स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने राजाभाऊ देसाई चषकानिमित्त राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील आघाडीच्या 12 संघाची झुंज लावली असून मुंबईकर कबड्डीप्रेमींना 10 ते 13 फेब्रूवारीदरम्यान हा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ठाणे विरुद्ध नंदुरबार असा रंगेल. यजमान मुंबई शहरचा सलामीचा सामना अहमदनगरविरुद्ध असेल.
गेल्या 77 वर्षांच्या कालखंडात अनेक राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धांबरोबर व्यावसायिक कबड्डी स्पर्धांचे सर्वांगसुंदर आयोजन करणाऱ्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा विशेष निमंत्रित जिल्ह्यांची अफलातून कबड्डी स्पर्धा खेळविण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. राज्य कबड्डी स्पर्धांचा इतिहासात आजवर निमंत्रित जिल्ह्यांची स्पर्धा प्रथमच खेळविली जात असून ही थरारक स्पर्धा आयोजित करण्याचे धाडस मुंबईकर आणि प्रभादेवीकर असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने दाखविले आहे.
त्यामुळे मुंबईकरांना “मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धा पाहण्याचे भाग्य लाभणार आहे. राज्य अजिंक्यपद” स्पर्धेवर प्रथमच आपले नाव कोरणाऱ्या रत्नागिरीसह उपविजेता मुंबई शहर, उपांत्य पराभूत सांगली आणि रायगड तसेच कोल्हापूर, ठाणे, मुंबई उपनगर आणि पुणे या संघांच्या सहभागामुळे राजाभाऊ देसाई चषकाला मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
स्पर्धेतील तगडे संघ आणि प्रो कबड्डीत जोरदार चढाया-पकडींचा खेळ करणारे स्टार कबड्डीपटू आपला दम घुमवणार असल्यामुळे चवन्नी गल्लीत उभारलेल्या नारायण सावंत क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींची अलोट गर्दी उसळणार, असा विश्वास मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी व्यक्त केला.
प्रत्येक लढतीत काँटे की टक्कर
राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वच संघ तुल्यबळ असल्यामुळे सारेच पूर्ण ताकदीनिशी राजाभाऊ देसाई चषकासाठी उतरणार आहेत.एकंदर चार गटात स्पर्धा खेळविली जाणार असून प्रत्येक गटात तीन संघ खेळतील. मुंबईला ब गटात स्थान मिळाले असून राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता रत्नागिरी अ गटात खेळत असून त्यांची गाठ ठाणे आणि नंदुरबार संघाशी पडेल.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत खेळतील. त्यामुळे गटात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला विजय हा महत्त्वाचाच असून प्रत्येक लढत ही काँटे की लढतच असेल. फक्त अडचण तेव्हाच होऊ शकते जेव्हा एका गटातील प्रत्येक संघाने प्रत्येकी एक विजय मिळविला असेल तेव्हा सरस गुणांच्या आधारे दोन संघ बाद फेरीत पोहोचलीत.
जेतेपदाच्या शर्यतीत सारेच
चिपळूण येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अनपेक्षितपणे रत्नागिरीच्या संघाने बाजी मारली होती. आपल्या घरच्याच मैदानावर खेळताना रत्नागिरीने मुंबई शहरचा 31-28 असा पराभव केला होता. आता शहरचा संघ आपल्या घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर आपल्या पराभवाचा वचपा काढेल, असा विश्वास कबड्डीप्रेमींना आहे. तसेच मुंबई उपनगर, रायगड आणि सांगली या शहरांनाही अटीतटीच्या लढतीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्या पराभवाची भरपाई करण्याची आणखी एक संधी राजाभाऊ देसाई चषकाच्या निमित्ताने चालून आली आहे. राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील उपउपांत्य फेरीतील सर्वच सामने थरारक झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती प्रभादेवीतही होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक संघात प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू असून दमदार खेळाडूंमुळे चढाया-पकडींचे वादळ प्रभादेवीतही घोंघावणार यात तीळमात्र शंका नाही.
मुंबई शहरची ताकद पंकज मोहिते, सुशांत साहिल आणि ओमकार जाधवमुळे वाढली आहे. रत्नागिरीसुद्धा स्वप्निल आणि शुभम शिंदेच्या तुफानी फॉर्ममुळे फार्मात आहे. तसेच मुंबईकरांना बिपीन थळे, अमीर धुमाळ (रायगड), निलेश साळुंखे, गिरीश इरनाक (ठाणे), निलेश शिंदे (उपनगर) यांचाही जोरदार खेळ पाहायला मिळेल.
दिमाखदार उद्घाटन सोहळा
राज्यातील सर्वच मातब्बर संघ खेळणार असल्यामुळे स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही दिमाखदार होणार आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर उभारलेल्या क्रीडानगरीत तब्बल दोन हजार प्रेक्षकांना मोहित करणारी रोषणाई करण्यात आली असून कबड्डीप्रेमींना “न भूतो न भविष्यति” अशी दमदार स्पर्धा पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल, असा दृढ विश्वास महेश सावंत यांनी व्यक्त केला.
तब्बल तीन लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी, स्थानिक आमदार सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर आणि पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या उपस्थितीत पार पडेल.
राजाभाऊ देसाई चषक स्पर्धेची गटवारी।
अ गट : रत्नागिरी, ठाणे, नंदुरबार
ब गट : मुंबई शहर, कोल्हापूर, अहमदनगर
क गट : रायगड, पुणे, पालघर
अ गट : सांगली, मुंबई उपनगर, नाशिक