भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी फार आधीच आपापल्या टी२० संघांची घोषणा केली आहे. परंतु अंतिम एकादशमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल? हे अजून निश्चित झालेले नाही.
त्यातही भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने कसोटी मालिकेत आक्रमक फलंदाजी करत टी२० संघाचे दार ठोठावले आहे. अशात पंतला भारतीय टी२० संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळेल का? त्याची निवड केली तर कोणत्या खेळाडूला बाहेर केले जाईल? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबतीत संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी वक्तव्य केले आहे.
पंत आणि राहुल यांच्यात टक्कर
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात पंतव्यतिरिक्त केएल राहुल हादेखील यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या दोघात तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटीत ताबडतोब खेळी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु राहुलही टी२० स्वरुपात भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू आहे. तो आयसीसीच्या टी२० क्रमवारीतही टॉप-५ मध्ये आहे.
फलंदाजी प्रशिक्षकांनी दिले उत्तर
यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पंत आणि राहुल यापैकी कोणाला संधी द्यावी?, हा मोठा प्रश्न असणार आहे. याबाबतीत ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना राठोड म्हणाले की, “राहुलने यष्टीरक्षक फलंदाजांच्या रुपात खूप चांगले प्रदर्शन केले आहे. तो एक दमदार क्रिकेटपटू आहे. मागील काही काळात त्याने फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणातही प्रतिभेची छाप सोडली आहे. पंतदेखील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो खूप चांगली कामगिरी करत आहे. संघ व्यवस्थापनाचे त्यांच्या दोघांच्याही कामगिरीवर लक्ष आहे.”
टी२० विश्वचषकासाठी अशी असेल भारताची योजना
यावर्षी भारतात टी२० विश्वचषक होणार आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारत आणि इंग्लंड यांच्यासाठी ही टी२० मालिका अतियश महत्त्वाची असणार आहे.
टी२० विश्वचषकातील योजनेसंदर्भात बोलताना राठोड म्हणाले की, “यंदा टी२० विश्वचषक भारतातच होणार आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की त्याआधीच भारतीय संघाची फलंदाजी फळी पूर्णपणे तयार व्हावी. इंग्लंडविरुद्धची टी२० मालिका संपेपर्यंत आम्हाला कळेल की टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी कोणते खेळाडू सज्ज आहेत. मला वाटते की, सध्याच्या भारतीय टी२० संघात जास्त बदल होणार नाहीत. कारण सध्याचा संघ संतुलित आहे. मात्र कोणत्या खेळाडू मालिकेदरम्यान दुखापत झाली तर संघात बदल करावे लागू शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप: ‘लॉर्ड्स’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना
आता एकच लक्ष्य! इंग्लंडला लोळवत टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान गाठणे, पराक्रमासाठी टीम इंडिया सज्ज