ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चिवट झुंज देत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला ३ विकेट्सने पराभूत केले आहे. यासह २-१ च्या फरकाने भारताने कसोटी मालिका खिशात घातली आहे. सोबतच नवा इतिहास रचला आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकत ब्रिस्बेनच्या मैदानावरील कसोटी सामन्यात न जिंकण्याची मालिका खंडीत केली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ५२ कसोटी सामने खेळले असून ९ सामन्यात विजय मिळवला आहे. यातील सर्वाधिक ४ सामने भारताने मेलब्रन क्रिकेट ग्राउंडवर जिंकले आहेत. १९७७ ते २०२० या कालावधीत भारतीय संघाने हे विजय मिळवले आहेत. तर ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर २००३ ते २०१८ या कालावधीत २ सामने जिंकले आहेत. याबरोबरच सिडनी (१९७८), पर्थ (२००८) आणि नुकताच ब्रिस्बेन (२०२१) येथे भारतीय संघाने कसोटी सामना खिशात घातला आहे.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राउंडवर भारतीय संघाने विजयी पताका झळकावली आहे.
असा झाला थरारक ब्रिस्बेन कसोटी सामना
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.
प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश
ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज