न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ (०४ डिसेंबर) संपला आहे. दिवसाखेर भारतीय संघाने २१ षटकांमध्ये बिनबाद ६९ धावा केल्या असून यजमानांकडे सध्या ३३२ धावांची आघाडी आहे. या डावात भारतीय संघाकडून कसोटीपटू चेतेश्वर पुजारा सलामीला फलंदाजीसाठी आला आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल याला क्षेत्ररक्षणादरम्यान कोपराची दुखापत झाल्याने भारतीय संघाने हा निर्णय घेतला आहे. यानंतर भारतीय संघाला आणि चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. यामागचे कारणही तसेच आहे.
खरे तर, पुजारा सहसा भारतीय संघाकडून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतो. परंतु वेळप्रंसगी त्याने सलामीलाही फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे, कसोटीपटू पुजाराने यापूर्वी ज्या कसोटी सामन्यात भारताकडून सलामीला फलंदाजी केली होती, त्या सामन्यात त्याने नाबाद शतकी खेळी केली होती.
पुजाराने याआधी २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची सलामीला फलंदाजी केली होती. २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान कोलंबोच्या मैदानावर हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून केएल राहुल आणि पुजारा डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. या डावात पुजाराला वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. एका बाजूने पटापट विकेट्स जात असताना पुजाराने मात्र डावाखेर आपली विकेट वाचवत टिच्चून फलंदाजी केली होती.
त्याने या सामन्यात २८९ चेंडूंचा सामना करताना नाबाद १४५ धावा कुटल्या होत्या. आपल्या या खेळीदरम्यान त्याने १४ चौकारही मारले होते. त्याच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने या डावात ३१२ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २०१ धावांवर सर्वबाद झाला होता. मात्र पुढे दुसऱ्या डावात पुजारा शून्यावरच बाद झाला होता. तरीही भारतीय संघाने शेवटी ११७ धावांच्या फरकाने श्रीलंकेवर मात केली होती. विशेष म्हणजे, नाबाद १४५ धावांच्या खेळीसाठी पुजाराला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
याचमुळे आता न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीला उतरलेल्या पुजारावर सर्वांच्या नजरा लागून आहे. या सामन्याच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पुजाराने नाबाद २९ धावा जोडल्या आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी तो या खेळीला पुढे नेत मागील सामन्याप्रमाणे शतक झळकावतो की नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम
पटेलच्या ‘परफेक्ट १०’चा थरार अनुभवा एकाच व्हिडिओतून, पाहा एकट्यानेच कशी उडवलीय भारताची दाणादाण