भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेत भारतीय संघाला दुखापतीने घेरलेले आहे. आतापर्यंत भारताचे जवळजवळ दहा खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. इकडे खेळाडू दुखापतग्रस्त होत असताना दुसरीकडे युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. या मालिकेत तब्बल 5 भारतीय खेळाडूंनी आपले कसोटी पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे 25 वर्षांतील केवळ दुसरीच वेळ आहे जेव्हा पाचपेक्षा जास्त भारतीयांनी एकच मालिकेत आपले कसोटी पदार्पण केले आहे.
भारताकडून सध्या सुरु असलेल्या बॉर्डर -गावसकर मालिकेत शुभमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर व टी नटराजन यांनी आपले कसोटी पदार्पण केले आहे. यापूर्वी 1996 च्या इंग्लंड दौऱ्यात सौरव गांगुली, राहुल द्रविड, विक्रम राठोड, सुनील जोशी व पारस म्हाम्ब्रे यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते.
दुखापत व इतर सर्व कारणांमुळे भारताने बॉर्डर-गावसकर मालिकेत तब्बल 19 खेळाडूंना खेळण्याची संधी दिलेली आहे. विशेष म्हणजे 1962 नंतर भारताने प्रथमच एखाद्या कसोटी मालिकेत इतक्या खेळाडूंना खेळविले आहे.
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताने अंतिम 11 जणांच्या संघात 4 बदल केले आहेत. दुखापतीमुळे रविंद्र जडेजा, आर अश्विन, हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह या सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग नाहीत. त्यांच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर, टी नराजन, शार्दुल ठाकूर आणि मयंक अगरवाल यांना संधी मिळाली असून हा नटराजन आणि सुंदर यांचा कारकिर्दीतील पहिलाच कसोटी सामना आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडीयाचं दुखापतीचं ग्रहण संपेना! चालू सामन्यात जायबंदी झाल्याने ‘हा’ प्रमुख गोलंदाज मैदानाबाहेर
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत १०० कसोटी सामने