आयपीएल सुरू होऊन आता तेरा वर्ष झाली आहेत. आयपीएलने या तेरा वर्षात जगभरातील क्रिकेटप्रेमींना कायम आनंद देण्याचे काम केले आहे. जगासमोर अनेक नवनवे प्रतिभावान खेळाडू आणले आहेत. काही विदेशी खेळाडू, भारतामध्ये इतके प्रसिद्ध झाले की, ते खेळाडू आज भारताला आपले दुसरे घर म्हणतात. कायम क्रिकेटरसिकांना उत्साहित करणाऱ्या आयपीएलला २०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने काळा डाग लागला. क्रीडाजगतात आयपीएलचे नाव काहीसे खराब झाले. मात्र, २०१२ आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंचे फिक्सिंग प्रकरण समोर आले होते. कोणी मोठा खेळाडू नसल्याने त्या प्रकरणाला तितकेसे महत्त्व मिळाले नाही. आज आपण, त्याच २०१२ फिक्सिंग प्रकरणाविषयी जाणून घेऊया.
२०१२ आयपीएल दरम्यान १४ मे रोजी, इंडिया टीव्हीने स्टिंग ऑपरेशनद्वारे एक दावा केला की, “आयपीएलमधील अनेक खेळाडू मॅच फिक्सिंग व स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी आहेत. यात खेळाडूंसह काही मालक व आयोजकांचा देखील सहभाग आहे. केवळ आयपीएलची नाही तर, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये देखील फिक्सिंग होत आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.”
इंडिया टीव्हीने स्टिंग ऑपरेशनच्या पुराव्या आधारे, टीपी सुधींद्र, अभिनव बाली, मोहनिश मिश्रा, अमित यादव व शलभ श्रीवास्तव अशी नावे घेतली. ज्या खेळाडूंवर आरोप ठेवण्यात आले होते, त्यापैकी सुधींद्र हा डेक्कन चार्जर्स, शलभ श्रीवास्तव व अमित यादव हे किंग्स इलेव्हन पंजाब तर मोहनीश मिश्रा पुणे वॉरियर्स इंडिया या संघात सहभागी होते.
या खेळाडूंची नावे फिक्सिंग प्रकारात आल्याने त्यांना तात्काळ आयपीएलमधून निलंबित करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वात एक शिस्तपालन समिती स्थापित करण्यात आली. ज्याचे सदस्य बीसीसीआयचे उपाध्यक्ष निरंजन शहा व अरुण जेटली होते. या त्रिसदस्यीय समितीने, प्रकरणाची पूर्ण चौकशी करत, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे सदस्य असलेल्या रवी सवानी यांच्याकडे अहवाल सादर केला.
अहवालात स्पष्टपणे नमूद केले होते की, “स्टिंग ऑपरेशनमधील पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होत आहे की, टीपी सुधींद्रने ५०,००० रुपयांच्या बदल्यात इंदोरमधील एका स्थानिक सामन्यात नोबॉल टाकला होता. शलभ श्रीवास्तव प्रत्यक्षरीत्या फिक्सिंगमध्ये सामील नसला तरी, भ्रष्टाचार व फिक्सिंगसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी तो तयार झाला होता. इतर तीन खेळाडू हे संबंधित स्टिंग ऑपरेशनमध्ये बढाया मारणे तसेच क्रिकेटला बदनाम करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.”
स्टिंग ऑपरेशन केलेल्या इंडिया टीव्हीच्या प्रमुखांनी या प्रकरणाविषयी बोलताना सांगितले, “आम्ही मागील एक वर्षापासून या सर्व खेळाडूंचा पाठपुरावा करत होतो. आम्ही एकूण दहा खेळाडूंशी संपर्क साधला. त्यातील हे पाच खेळाडू आमिषाला बळी पडले. इतर पाच खेळाडू म्हणजे रजत भाटिया, भार्गव भट, समद फल्लाह, मनविंदर बिस्ला व सिद्धार्थ त्रिवेदी यांनी स्पष्ट शब्दात आमच्या प्रस्तावाला नकार दिला होता. भारतीय क्रिकेट साफ करण्याच्या आम्ही केलेल्या प्रयत्नाला बीसीसीआयने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.”
आरोप असलेल्या खेळाडूंशी रवी सवानी यांनी चर्चा केल्यानंतर, ३० जून २०१२ रोजी सर्व खेळाडूंना शिक्षा सुनावण्यात आली. २०११-१२ च्या रणजी हंगामात सर्वाधिक ४० बळी मिळवणारा मध्य प्रदेशचा व डेक्कन चार्जर्सचा वेगवान गोलंदाज टीपी सुधींद्र याच्यावर आजीवन बंदी घातली गेली. मोहम्मद अझरुद्दीन व अजय शर्मा यांच्यानंतर फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घातलेला तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. शलभ श्रीवास्तव याला पाच वर्षासाठी क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. इतर तीन जण म्हणजेच अभिनव बाली, मोहनीश मिश्रा व अमित यादव यांना प्रत्येकी एक वर्षासाठी कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळण्यास मनाई करण्यात आली.
२०१२ मध्ये आयपीएलला बसलेला फिक्सिंगचा हा सौम्य धक्का होता. यातून काहीही बोध न घेता २०१३ मध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंडिला यांनी स्पॉट फिक्सिंग केल्याचे पुरावे समोर आले. या प्रकरणाने आयपीएल व भारतीय क्रिकेटची प्रतिमा जगभरात मलीन झाली होती.
वाचा- चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी