भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गडी राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीपुढे भारतीय फलंदाजांची डाळ शिजली नाही आणि भारताला शतकातील सर्वात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या अत्यंत निराशाजनक पराभवाची पाच कारणे प्रामुख्याने समोर येतात.
१) नवोदित सलामीवीरांचा बेजबाबदारपणा
भारताचा प्रमुख सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेतील पहिल्या दोन सामान्यांसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत भारताने पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल या दोन तरुण खेळाडूंवर सलामीची जबाबदारी टाकली होती. मात्र, हे दोन्ही खेळाडू आपले कौशल्य दाखवू शकले नाहीत. आयपीएलपासूनच खराब फॉर्ममध्ये असणाऱ्यां पृथ्वी शॉने दोन्ही डावात अनुक्रमे ० आणि ४ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर मयंक अगरवाल हा देखील १८ तसेच ९ धावांच्या पुढे आपल्या खेळ्या घेऊन जाऊ शकला नाही. केएल राहुलसारखा फॉर्मत असणारा अनुभवी फलंदाज व सराव सामन्यात अर्धशतक झळकावणारा शुबमन गिल यांना संघाबाहेर ठेवून संघ व्यवस्थापनाने चूक केल्याचे स्पष्टपणे या सामन्यात जाणवले.
२) खराब क्षेत्ररक्षण
भारताच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अत्यंत खराब क्षेत्ररक्षण केले. भारताने काढलेल्या २३३ धावांच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची अवस्था एकवेळ ८९ धावांवर ५ बाद अशी झाली होती. मात्र, भारताच्या क्षेत्ररक्षकांनी मार्नस लॅब्युशेनला तीन तर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला दोन जीवदाने दिली. लॅब्युशेनने त्या डावात ४७ तर पेनने नाबाद ७३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला लवकर बाद होण्यापासून वाचवत १९१ धावा जमवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपले असता तर भारताला पहिल्या डावात आणखी मोठी आघाडी मिळाली असती.
३) लोअर मिडल ऑर्डरचे अपयश
भारताच्या पराभवासाठी लोअर मिडल ऑर्डरने योगदान न देणे देखील तितकेच जबाबदार राहील. प्रमुख पाच फलंदाज बाद झाले तरी प्रत्येक संघ नेहमीच आपल्या लोअर मिडल ऑर्डरकडून अपेक्षा बाळगून असतो. भारताकडून हनुमा विहारी, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या रविचंद्र अश्विन यांनी फलंदाजीत अत्यंत साधारण कामगिरी केली. हे तीनही खेळाडू उत्तम फलंदाज मानले जात असले तरी, त्यांना आपल्या लौकिकास साजेसा खेळ दाखवता आला नाही. विहारीने दोन्ही डावात मिळून २४, साहाने १३ तर अश्विनने फक्त १५ धावांचे योगदान दिले.
४) कर्णधाराकडून झाल्या क्षुल्लक चुका
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून गोलंदाजी बदलात अनेक चुका झाल्या. ऑस्ट्रेलियाची अवस्था सात बाद १११ अशी असताना विराटने रक्षात्मक पद्धतीने क्षेत्ररक्षण लावून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावा काढण्यासाठी मोकळे रान दिले. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत अखेरच्या तीन गड्यांसाठी तब्बल ८० धावा जोडल्या. त्या धावा काही प्रमाणात कमी झाल्या असत्या तर, कदाचित भारताला काहीशी मोठी आघाडी मिळाली असती.
५) गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव पडला कमी
भारतीय क्रिकेट संघ अवघ्या दुसऱ्यांदा गुलाबी चेंडूने आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाचा हा नववा दिवस-रात्र कसोटी सामना ठरला. गुलाबी चेंडू किती स्विंग होतो आणि त्याचा वापर कसा करायचा आहे हे तंत्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच अवगत आहे. भारतीय गोलंदाज गुलाबी चेंडूने जास्त न खेळल्याने ते काहीश्या द्विधा मनस्थितीत असलेले दिसून आले.
मेलबर्न येथे खेळला जाणार दुसरा सामना
मालिकेतील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे भारतात परतणार असल्याने, भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करेल. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख सलामीवीर डेविड वॉर्नर या सामन्यातून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. वॉर्नर वनडे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने टी२० मालिका व पहिल्या कसोटीला मुकला होता.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस