आयपीएलच्या २०२०मध्ये मुंबई इंडियन्स संघाला दुसरा सामना गमवावा लागला. रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला या पराभवाला सामोरे जावे लागले. आरबीसीसाठीदेखील हा सामना सोपा नव्हता तरीही त्यांनी सामना जिंकला. मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत सामना बरोबरीत सोडविला आणि त्यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. असे असले तरी हा सामना अतिशय रोमांचक सामना होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव का झाला याची कारणे जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सच्या पराभवाची तीन कारणे
तीन मुख्य वेगवान गोलंदाज अपयशी
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला नाही. मुंबईच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाची धुलाई झाली. मुंबई इंडियन्सचे तीन मुख्य वेगवान गोलंदाज अपयशी ठरले. यावेळी आरसीबीच्या फलंदाजांना बाद करण्यात मुंबईच्या गोलंदाजांना अपयश आले. याचाच परिपाक म्हणजे आरसीबीने केलेल्या धावा.
वरची फळी अपयशी
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची वरची फळी अपयशी ठरली. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने धावा केल्या नाहीत. याशिवाय मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याही फ्लॉप ठरले. शेवटी ईशान किशन आणि कायरन पोलार्डने धावा केल्या, अन्यथा हा सामना सहज आरसीबीकडे जिंकू शकली असती.
सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाजीचा क्रम
सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने फलंदाजीचा क्रम चुकीचा निवडला. कायरन पोलार्ड आधीच सेट झाला होता म्हणून त्याला पाठविण्यात आले, पण हार्दिक पंड्याला सोबत पाठवण्याचा एक विचित्र निर्णय मुंबईने घेतला होता. त्याच्या जागी स्वतः रोहित शर्मा जर आला असता तर कदाचीत निकाल वेगळा लागला असता. ईशान किशन हा दुसरा चांगला पर्याय होता. त्याने 99 धावा केल्या होत्या. योग्य फलंदाज सुपर ओव्हरमध्ये न पाठवणे हे देखील पराभवामागचे एक कारण ठरले.