ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक कसोटी विजय मिळवत भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवरील सलग दुसरी कसोटी मालिका जिंकली. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा संपल्याने आता भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र भारतात परतल्यानंतर एका मुलाखतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सिडनीत अनुभवाव्या लागलेल्या वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल खुलासा केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवला गेला होता. या सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या दिवसाच्या प्रकारानंतर भारताने आयसीसीकडे औपचारिक तक्रार देखील नोंदवली होती. मात्र चौथ्या दिवशी सीमारेषेवर उभ्या असलेल्या सिराजबाबत तोच प्रकार पुन्हा झाल्याने भारतीय संघाने सामना थांबवून पंचांकडे तक्रार केली होती. त्यांनतर पंचानी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलले होते.
“पंचांनी दिला होता मैदान सोडून जाण्याचा पर्याय”
आता याच प्रकाराबाबत सिराजने भारतात परतल्यावर सविस्तर भाष्य केले आहे. तो म्हणाला, “ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी तत्काळ आमचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या कानावर घातली. त्याने पंचांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पंचांनी आम्हाला मैदान सोडून जाण्याचा पर्याय दिला होता, मात्र रहाणेने तो स्विकारला नाही. आम्ही खेळाचा आदर करतो, त्यामुळे आम्ही मैदान सोडून जाणार नाही पण त्या प्रेक्षकांना बाहेर काढा, असा पवित्र रहाणेने घेतला. त्यामुळे त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आले.”
“शेरेबाजीने अधिक चांगली कामगिरी करण्याची ईर्षा निर्माण झाली”
या प्रकरणाचा स्वत:वर काय परिणाम झाला यावर बोलताना सिराज म्हणाला, “ते प्रेक्षक वर्णद्वेषी शेरेबाजी करत होते. मात्र त्यामुळे मानसिकरित्या अजूनच कणखर झालो. मी त्याकडे दमदार कामगिरी करण्याची अजून एक संधी म्हणून पाहिले. आम्ही याबाबत तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी चालू आहे. यातून योग्य न्याय मिळेल, अशीच आमची अपेक्षा आहे.”
महत्वाच्या बातम्या:
मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले विराट आणि अनुष्का; पाहा व्हिडिओ
बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत
ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या घातक खेळाडूंचे पुनरागमन