भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात शुक्रवारी (१२ मार्च) अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याच्या एक दिवसआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पहिल्या टी२० सामन्यातील सलामी जोडीचे नाव सांगितले होते. परंतु सामन्याच्या काही मिनिटांपुर्वी रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर असल्याचे सांगत त्याने सर्वांना अचंबित केले होते. आता या निर्णयामागचे कारण समोर आले आहे.
पहिल्या टी२० सामन्यातील नाणेफेक झाल्यानंतर विराटने घोषित केले की, रोहितला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवन आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील.
…म्हणून रोहितला दिली गेली विश्रांती
या निर्णयामागचा सबब सांगताना विराट म्हणाला की, “आम्हाला पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. कारण दुसऱ्या टप्प्यात मैदानावर दव पडल्यामुळे चेंडूवर पकड मिळवता येत नाही. यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे अवघड जाते. आता आम्हाला सामन्यात टिकून राहावे लागणार आहे आणि इंग्लंडला कोणत्याही प्रकारे अडवायला हवे.”
“आता आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली तर कशाप्रकारे डाव पुढे न्यायचा?, मैदानावर ओलावा असताना कशाप्रकारे गोलंदाजी करावे लागेल? या गोष्टींची योजना आखत आहोत. यामुळे टी२० विश्वचषकात आम्हाला फायदा होणार आहे. पुढील काही महिने संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. यामुळेच आम्ही रोहितला सुरुवातीच्या काही सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे शेवटी विराटने सांगितले.
रोहित डावाची सुरुवात करणार असल्याचे दिले होते संकेत
पहिल्या टी२० सामन्यापुर्वी विराटने रोहित या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत दिले होते. पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला होता की, “हे काहीसे सोपे आहे. वरच्या फळीत आमच्यासाठी राहुल आणि रोहितने चांगली कामगिरी केली आहे. ते दोघे खेळाची सुरुवात करतील. तसेच जर रोहितला विश्रांती दिली किंवा राहुलला एखादी दुखापत झाली तर शिखर धवन तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच टी२० सामन्यात राडा, भर मैदानात भिडले सुंदर-बेयरस्टो अन्…; पाहा व्हिडिओ
शिखर, विराट, केएल राहुलच्या विकेट्सने आत्तापर्यंत कधीही आली नव्हती ती वेळ भारतीय संघावर आणली