भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारी (४ ऑगस्ट) होत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यासाठीही मालिका अत्यंत महत्त्वाची असून, भारतीय संघ विजय मिळवण्याचा निकराचा प्रयत्न करेल. या पाच सामन्यांच्या मालिकेत विराटकडे अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची सुवर्णसंधी आहे. आज आपण याच विक्रमांबाबत जाणून घेऊया.
१) विराट होणार आठ हजारी मनसबदार
सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेला विराट या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण करू शकतो. सध्या त्याच्या नावावर ९२ कसोटीमध्ये ७५४७ धावा जमा आहेत. त्याने या पाच सामन्यांच्या डावांमध्ये ४५३ धावा जमवल्यास तो हा पल्ला गाठेल. विराटने मागील दौऱ्यावर अशीच कामगिरी केली होती.
२) इंग्लंडविरुद्ध दोन हजार धावा करण्याची संधी
विराट या मालिकेत इंग्लंडविरुद्ध २००० कसोटी धावा पूर्ण करू शकतो. २०१६ पासून तो इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत आला आहे. आगामी मालिकेत २५८ धावा जमवून तो ही आकडेवारी गाठेल.
३) कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके
या मालिकेत एक शतक झळकावून तो केवळ आपला शतकांचा दुष्काळ संपवणार नाही तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा पराक्रम करेल. सध्या त्याच्या नावे कर्णधार म्हणून ४१ शतके असून इतकीच शतके रिकी पॉंटिंगने साजरी केली होती.
४) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
या मालिकेत एक शतक ठोकत विराट ७१ आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण करेल. यासोबत तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होईल. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांची नोंद आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने ७० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.
५) क्लाईव्ह लॉईड यांना सोडणार मागे
मालिकेत एक विजय साजरा करताच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा भारताचा ३६ वा कसोटी विजय ठरेल. यासोबत तो क्रिकेट इतिहासातील पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. मालिकेतील एका विजयामुळे विराट सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया) सर्वात यशस्वी ठरणारा आशियाई कर्णधार बनेल. सध्या तो आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी सेना देशांमध्ये प्रत्येकी चार विजय संपादन केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध इंग्लंड कोण जिंकणार मालिका?, दोन इंग्लिश कर्णधारांनी दिले ‘हे’ उत्तर
कौतुकास्पद! “कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी सर्वस्व झोकून देईल”, विराटने दिला शब्द
बांगलादेश क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला दणदणीत विजय