भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना सर्वात जास्त भीती शोएब अख्तरची वाटायची असे सांगितले आहे.
युसी ब्राउझर आयोजित लाइव्ह व्हिडीओ चॅट या कार्यक्रमात बोलताना सेहवागने हा खुलासा केला.
”माझ्या संपुर्ण कारकिर्दीत शोएब हा असा एकमेव गोलंदाज होता, की त्याचा कोणता चेंडू पायाच्या घोट्यावर, कोणता चेंडू डोक्यावर येवून आदळेल याचा काही नेम नव्हता. त्याने अनेक वेळा माझ्या डोक्यावर बाउन्सर मारले आहेत. मला त्याची भीती वाटायची तरीही मी त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करायचो,” असे सेहवागने सांगितले.
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला ”2007 सालचा टी-20 विश्वचषक आणि 2011 सालचा वन-डे विश्वचषकस्पर्धा जिंकल्याचे क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय आहेत. 2007 साली दक्षिण अफ्रिकेत झालेला टी-20 वर्ल्ड कपसाठी सर्व तरूण खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळे कोणालाही हा संघ ही स्पर्धा जिंकेल असे वाटले नव्हते. 2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेपुर्वी कोणताही यजमान संघा ही स्पर्धा जिंकला नव्हता”.
या व्हिडीओ चॅट दरम्यान पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहीद अफ्रिदीने देखील 2009 साली पाकिस्तानने जिंकलेल्या टी-20 विश्वचषकस्पर्धेच्या आठवनींना उजळा दिला.