भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा गुरूवारी (२९ जुलै) संपुष्टात आला. वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला टी२० मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, संघ शुक्रवारी (३० जुलै) मायदेशी रवाना होण्यापूर्वी फिरकीपटू युजवेंद्र चहल व अष्टपैलू कृष्णप्पा गौतम हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे दोघे इतर संघासह भारतात परतणार नाहीत. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महत्त्वपूर्ण अपडेट दिले.
चहल व गौतम आढळले कोरोना पॉझिटिव्ह
श्रीलंका दौऱ्याच्या समाप्तीनंतर भारतीय संघ कोलंबोहून बेंगलोरला प्रयाण करणार होता. तत्पूर्वी, घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत युजवेंद्र चहल व कृष्णप्पा गौतम हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पंड्या हा कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर, त्याच्या संपर्कातील आठ खेळाडूंना देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कृष्णप्पा गौतम व इशान किशन यांचा समावेश होता.
काय आहे नियम?
कृणालपाठोपाठ चहल व गौतम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हे तिघे भारतात परतणार नाहीत. श्रीलंका कोविड प्रोटोकॉलनुसार या तिघांना पूर्णपणे बरे होईपर्यंत क्वारंटाईन राहावे लागेल. भारतात येण्यापूर्वी या तिघांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येईल. ती नकारात्मक आल्यानंतरच त्यांना भारतात जाण्याची परवानगी दिली जाईल.
सूर्यकुमार व पृथ्वी शॉ जाणार इंग्लंडला
कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्याने पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास विलंब लागू शकतो. इंग्लंडमध्ये जखमी झालेल्या वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान यांचे बदली खेळाडू म्हणून त्यांना संधी मिळाली आहे. परंतु, या दोघांचे कोरोना अहवाल नकारात्मक आल्यानंतरच त्यांना इंग्लंडला जाण्याची परवानगी देण्यात येईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हसरंगाची ‘लॉटरी’! आयपीएलचे ‘हे’ ३ संघ देऊ शकतात संधी
आहा कडक! नव्या लूकमध्ये अजूनच तरुण दिसतोय ‘कॅप्टनकूल’ धोनी, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट