भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी२० आणि वनडेत विश्वविजेता बनवणाऱ्या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मैदानावर रागावताना खूप कमीवेळा पाहिले गेले आहे. यामुळेच त्याला कॅप्टनकूल म्हटले जाते. पण, भारताचा फिरकीपटू कुलदिप यादवने एकदा स्पोर्ट्स अँकर जतिन सप्रूशी इंस्टाग्राम व्हिडओ चॅट दरम्यान धोनीच्या रागाबाबत खुलासा केला होता.
यादवने (Kuldeep Yadav) धोनीशी संबंधीत एक किस्सा सांगितला होता, ज्यात तो धोनीच्या रागाला बघून घाबरला होता. तेव्हा धोनीने (MS Dhoni) त्याला म्हटले होते की, २० वर्षांत पहिल्यांदा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले होते.
यादवने व्हिडिओत सांगितले होते की, “२०१७मध्ये आम्ही इंदौर येथे श्रीलंकाविरुद्ध टी२० सामना खेळत होतो. यावेळी श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुशल परेरा (Kusal Perera) फलंदाजी करत होता. त्याने माझ्या चेंडूवर कव्हर्सपासून वरती येत चौकार ठोकला होता. तेव्हा धोनीने यष्टीमागून ओरडत मला म्हटले होते की, मी क्षेत्ररक्षणात बदल करायला हवेत. पण धोनीने मला दिलेला हा सल्ला मला ऐकूच आला नव्हता. पुढे माझ्या दुसऱ्या चेंडूवर परेराने रिव्हर्स स्वीप करत पुन्हा चौकार ठोकला. यानंतर जे घडले त्याचा मी विचारसुद्धा केला नव्हता.”
“धोनी रागात माझ्याजवळ आला आणि म्हणाला यादव तू मुर्ख आहेस का? मी ३०० वनडे सामने खेळले आहेत आणि तुला समजून सांगत आहे की इथे चेंडू टाक, तरी तू माझ्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहेस. पण पुढे धोनीने क्षेत्ररक्षकात योग्य बदल केले आणि त्यानंतर काही वेळातच मला विकेट मिळाली. त्या सामन्यात मी ४ षटकात ५२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या,” असे यावेळी यादव म्हणाला.
भारताने या सामन्यात श्रीलंकेला ८८ धावांनी मात दिली होती. रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात कर्णभारपद सांभाळले होते. तर, यष्टीरक्षणाची जबाबदारी धोनीकडे होती. यावेळी रोहितने ११८ धावांची शतकी खेळीही केली होती आणि तो सामनावीरही ठरला होता.
धोनीसोबतच्या किस्स्याविषयी बोलताना यादव म्हणाला की, “या घटनेनंतर मी खूप घाबरलो होतो. बसमध्ये हॉटेलकडे परत जात असताना मी धोनीजवळ गेलो आणि त्याची क्षमा मागितली. मी त्याला विचारले की, तूझे यापुर्वी कधी असे नियत्रंण सुटले आहे का? यावर धोनी मला म्हणाला की, मला २० वर्षांपुर्वी जेव्हा मी रणजी ट्रॉफी खेळत होतो, तेव्हा खूप राग येत होता. पण, भारताकडून खेळताना मला २ ते ३ वेळाच राग आला असेल.”
“धोनीला बरेच अनुभव आहेत. त्याने भारतीय संघाला खूप काही दिले आहे. अशात जर एवढा महान क्रिकेटपटू संघात नसेल तर त्याची कमी खूप जाणवते. रिषभ पंत आणि केएल राहूल हे युवा खेळाडू आहेत, ते खूप चांगले खेळत आहेत. त्यामुळे संघात जास्त फरक पडत नाही. पण तरी धोनीची कमी कधी-कधी जाणवत असते,” असेही पुढे बोलताना यादवने सांगितले होते.