क्रिकेट आणि वाद यांचे तर जणू काही खूप गूढ नाते राहिले आहे. क्रिकेट जगतात सुरुवातीपासूनच अनेक वादविवाद घडले आहेत. त्यामध्ये अधिकतर वाद हे मैदानात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये घडत असतात. जसे की, एखादा खेळाडू विरोधी संघाच्या खेळाडूबद्दल वाईट वक्तव्य करतो.
समालोचन करताना समालोचकाची घसरली जीभ; झाला मोठा वाद
मैदानाबाहेर कॉमेंट्री बॉक्समध्येही अनेकदा वादांचा जन्म होतो. तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये समालोचकाच्या अनुपस्थितीची कल्पनादेखील केली जाऊ शकत नाही. परंतु कधी- कधी समालोचनादरम्यान समालोचकाकडूनही विवादात्मक कमेंट केलेली पहायला मिळते.
समालोचना दरम्यान कोणतीही चूक न होण्याची काळजी समालोचकाकडून घेतली जाते. सामन्याशी संबंधित गोष्टींची अचूक माहिती समोलाचक देत असतो. परंतु समालोचन करताना इंग्लंडच्या समालोचकाची जीभ घसरली जेणेकरून एक मोठा वाद निर्माण झाला होता.
नासिर हुसेन यांनी भारतीय संघाच्या ३ खेळाडूंसाठी वापरला गाढव हा शब्द
ते समोलोचक इतर कोणी नसून इंग्लंडचे माजी दिग्गज कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) आहेत. इंग्लंडच्या चपळ कर्णधारांपैकी एक समजल्या जाणाऱ्या हुसेन यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंबद्दल समालोचन करताना अपशब्द वापरल्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते.
ही घटना आहे २०११मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्याची. जेव्हा हुसेन भारत आणि इंग्लंड संघातील एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात समालोचन करत होते, त्यावेळी त्यांनी क्षेत्ररक्षण करत असलेल्या भारतीय संघाच्या ३ खेळाडूंना ‘गाढव’ म्हटले. या घटनेने वातावरण चांगलेच तापले होते. हुसेन यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यांचे हे वक्तव्य केवळ भारतीय चाहत्यांनाच नाही, तर काही दिग्गज समालोचकांनाही आवडले नाही.
त्यानंतर हुसेन यांनी या शब्दासाठी भारताच्या ३ खेळाडूंचेही नाव सांगितले
खरंतर ही घटना त्या वेळी घडली होती, जेव्हा इंग्लंड संंघ भारताने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. यादरम्यान मुनाफ पटेलचा चेंडू केविन पीटरसनच्या (Kevin Pietersen) बॅटच्या कोपऱ्याला लागून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या पार्थिव पटेलच्या हातातून निसटला तसेच इंग्लंडला ४ धावा मिळाल्या. त्यानंतर हुसेन यांनी त्याच्यासाठी ‘गाढव’ या शब्दाचा वापर केला.
त्यांनी समालोचन करताना म्हटले होते, “भारत आणि इंग्लंड संघात केवळ क्षेत्ररक्षणाचा फरक आहे. इंग्लंड संघाचे क्षेत्ररक्षण चांगले आहे. भारतीय संघात ३-४ चांगले खेळाडू आहेत. परंतु मैदानात एखादा खेळाडू गाढवदेखील आहे.”
हुसेन यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापले आणि भारतीय चाहत्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. त्याचबरोबर तत्कालीन समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri), सबा करीम आणि झहीर अब्बासनेदेखील हे चूकीचे असल्याचे सांगितले.
हुसेन एवढ्यावरच थांबले नाहीत आणि त्यांनी त्याच दौऱ्यात पुढच्या वनडे मालिकेदरम्यान भारतीय संघासाठी पूर्वी वापरलेले वक्तव्य पुन्हा वापरले. त्याचबरोबर संजय मांजरेकरांबरोबर चर्चा करताना त्यांनी ‘गाढव’ म्हटलेल्या खेळाडूंचे नावही सांगितले. त्यात हुसेन म्हणाले, “मुनाफ पटेल (Munaf Patel), पार्थिव पटेल (Parthiv Patel) आणि प्रवीण कुमार (Praveen Kumar) हे खेळाडू होते, ज्यांना मी गाढव म्हटले होते.”