“जर तुझ्यासमोर ग्लेन मॅकग्रा गोलंदाजीला आला तर काय करशील? ”
असा प्रश्न एका युवा खेळाडूला विचारला गेला. त्यावर त्याने उत्तर दिले,
“फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये असेल तर स्वीप खेळेल. ”
त्या मुलाच्या उत्तराने सगळे हसायला लागले. मॅकग्रासारख्या बुद्धिमान, एकाच जागेवर दिवसभर टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजाला स्वीप मारणे हे एक दिवास्वप्नच होते. जेव्हा खरच मॅकग्रा त्याच्यासमोर आला तेव्हा त्याने हे करून देखील दाखवले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्या खेळाडूने मॅकग्राला शेवटच्या षटकात १३ धावा फटकावल्या होत्या.
३०२ धावांचा पाठलाग करताना संघ ३०१ पर्यंत पोहचला पण त्या १३ धावांमुळे आणि त्यातही त्या धावा ज्याप्रकारे बनविल्या गेल्या त्याकारणाने, तो युवा खेळाडू मात्र प्रसिद्ध झाला. तो विचीत्र शॉट त्या फलंदाजाच्या नावाने ओळखला जावू लागला आणि त्या शॉटचा पुढचा तडाखा खाण्याची वेळ होती भारताची. तो शॉट होता, ‘मरीलियर स्कूप’ तो शॉट खेळणारा खेळाडू होता झिम्बाब्वेचा डग्लस मरीलियर (Douglas Marillier).
खानदानी क्रिकेटर-
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू टोनी मरीलियर हे डग्लसचे पिता होत. डग्लस अवघा आठ दिवसाचा असताना, तो पुढे क्रिकेटर व्हावा म्हणून त्याचा हाती चेंडू दिला होता. त्याचा भाऊ हा सुद्धा यष्टीरक्षक म्हणून क्लब क्रिकेट खेळायचा. टोनी यांनी डग्लसचे ऍडमिशनसुद्धा त्याच शाळेत केले जेथे झिम्बाब्वेचे महान खेळाडू फ्लॉवर बंधू शिकले.
डग्लस सोळा वर्षांचा असताना त्याचा अपघात झाला. डॉक्टरांनी सांगितले, आता हा चालूसुद्धा शकणार नाही. डग्लस व्हीलचेअर असताना देखील मैदानावर जात आणि अंपायरिंग करत. क्रिकेटप्रती एकनिष्ठ राहत तो दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा मैदानावर परतला.
फरीदाबाद वन-डे
२००२ च्या दौऱ्यासाठी झिम्बाब्वे संघ भारतात दाखल झाला. मालिकेचा पहिला सामना ७ मार्चला पहिला फरीदाबादमध्ये होता. सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांची अर्धशतके व अजित आगरकरच्या १९ चेंडूतील आक्रमण ४० धावांनी धावफलकावर २७४ धावा लागल्या. भारताकडे चांगल्या गोलंदाजांचा ताफा असल्याने प्रेक्षकांना भारत जिंकणारच असा दृढ विश्वास होता. पण, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात ते उगीच का?
भारताने दिलेले २७५ धावांचे आव्हान पार करताना एलिस्टर कॅम्पबेल आणि अँडी फ्लॉवर यांनी वैयक्तिक अर्धशतके पुर्ण केली मात्र, सातत्याने विकेट पडत गेल्याने झिम्बाब्वेची अवस्था ४१.३ षटकात ७ बाद २०० अशी झाली होती. ५१ चेंडूत ७५ धावा हव्या होत्या आणि हातात फक्त तीन विकेट शिल्लक होते. झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी चमत्काराची गरज होती. दुष्काळात तेरावा महिना तसे पुढच्या १५ चेंडूंमध्ये फक्त ९ धावा निघाल्या. आता ६ षटकांत ६६ धावा हव्या होत्या. भारताच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. आणि….
मरीलियर मॅजिक-
डावाचे ४५ वे षटक टाकण्यासाठी संजय बांगरने चेंडू हाती घेतला. बांगरने दुसऱ्याच चेंडूवर डीयान इब्राहिमला बाद केले आणि मैदानावर उतरला डग्लस मरीलियर उतरला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेत त्याने खाते उघडले. पुन्हा शेवटच्या चेंडूवर चौकार मारत झिम्बाब्वेसाठी टाळ्या वाजविण्याची संधी दिला.
पुढच्या षटकात त्याने फिरकीपटू अनिल कुंबळेला दोन चौकार मारले पण त्या षटकात फक्त १० धावा आल्या. अजूनही चार षटकात ४९ धावा हव्या होत्या अन हातात दोन विकेट्स शिल्लक. ४७ वे षटक घेऊन आला युवा झहीर खान.
पहिल्या दोन चेंडूवर मरीलियरने ६ धावा काढल्या. ज्यात झहीरने एक नो बॉल टाकत मरीलियरला सहकार्य केले. पुढचा चेंडूसुद्धा झहीरने नो बॉल टाकला आणि भारतीयांनी पहिल्यांदा हा विचीत्र शॉट पाहिला.
विटीदांडूसारखे उभे राहून मरीलियरने विकेटकीपरच्या डोक्यावरुन चेंडू उडवत दोन धावा घेतल्या. पुढचा चेंडू यॉर्कर टाकत झहीरने पुनरागमन केले खरे मात्र तिसऱ्या चेंडूवर मरीलियरने स्वीप खेळत षटकार ठोकला आणि चौथ्या चेंडूवर स्वतःचा ‘मरीलियर स्कूप’ दाखवत एक चौकार वसूल करत झहीरच्या गोलंदाजीची हवाच काढून घेतली. पुढच्या दोन चेंडूवर एकच धाव निघाली मात्र आता समीकरण बदलले होते. १८ चेंडूत २८ धावा.
पुन्हा एकदा संजय बांगर गोलंदाजीसाठी आला. जोशात आलेल्या मरीलियरने पुढे सरसावत पहिल्याच चेंडूवर सणसणीत चौकार मारला. आता प्रेक्षकांचे काळीज धडधडू लागले होते. मैदानावर सुद्धा वरिष्ठ खेळाडू संजय बांगरला समजाविण्यासाठी गोळा झाले. पुढच्या चेंडूवर एक धाव निघाल्याने तायबु स्ट्राइकला आला बांगरने दोन चेंडू निर्धाव टाकत तायबुला बाद केले. त्या षटकात फक्त पाच धावा निघाल्या. १२ चेंडू २३ धावा असे समीकरण झाले.
मरीलियरला शेवटच्या विकेटसाठी साथीला आला गॅरी ब्रेंट. ४९ वे षटक टाकण्यासाठी कर्णधार गांगुलीने पुन्हा झहीर खानकडे चेंडू सोपवला. भारताच्या दुर्दैवाने पुन्हा मरीलियर स्ट्राईकवर होता. झहीरने या षटकातदेखील दोन नो बॉल टाकले तर मरीलियरने आपल्या ‘मरीलियर शॉट’ च्या मदतीने दोन चौकार वसूल करत त्या षटकात १३ धावा काढल्या. आता झिम्बाब्वेला विजयासाठी एका षटकात १० धावा तर भारताला एक विकेट हवी होती.
अखेरचे निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी अनुभवी अनिल कुंबळेकडे आली. मरीलियरने थंड डोक्याने खेळत पहिलाच चेंडू सीमारेषेपार पाठवत फक्त २१ चेंडूत आपले अर्धशतक झोकात पूर्ण केले. कुंबळेने पुढील तीन चेंडूवर फक्त दोन धावा दिल्या. पाहुण्यांना आता दोन चेंडूत चार धावांची आवश्यकता होती.
कुंबळेने चेंडू टाकला. मरीलियरने सामना संपवायच्या इराद्याने जोरदार बॅट फिरवली आणि बॅटची कड घेऊन चेंडू विकेटकीपर अजय रात्राच्या डोक्यावरून सीमापार गेला. पंचांनी नो बॉल चा इशारा देखील केला परंतु त्याने फरक पडणार नव्हता.
झिम्बाब्वेने १० व्या क्रमांकवर फलंदाजीला आलेल्या मरीलियरच्या स्वप्नवत आणि झुंजार खेळीच्या जोरावर भारताला घरच्या मैदानावर पराभूत करण्याची किमया केली होती.
भारताविरुद्ध १०व्या किंवा ११व्या क्रमांकावर फलंदाजीस येत अर्धशतकी खेळी आजपर्यंत तीन खेळाडूंनी केली आहे. एक वेस्ट इंडिजचा रवी रामपाल (नाबद ८६), डग्लस मरीलियर (नाबाद ५६) आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी (५५) हे ते दोन क्रिकेटर. विशेष म्हणजे यातील फक्त मरीलियरची खेळीमुळेच भारतीय संघ पराभूत झाला.
कारकीर्द-
डग्लस मरीलियरने झिम्बाब्वेसाठी ४८ वनडे सामने खेळून त्यामध्ये ६७२ धावांसोबतच ३० बळी देखील मिळवले. त्याची कसोटी कारकीर्द पाच सामन्यापर्यंत मर्यादित राहिली. २००४ मधील झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड व खेळाडू यांमधील जो वाद झाला त्यावेळी क्रिकेट सोडणाऱ्या खेळाडूंमध्ये मरीलियर सामिल होता.
झिम्बाब्वे सोडल्यानंतर २००४ मध्ये निवृत्ती जाहीर करत मरीलियर इंग्लंडला गेला पण तिथे काही न करता आल्याने पुन्हा मायदेशी परतला त्याने रियल इस्टेटच्या व्यवसायात हात आजमावले परंतु तेथेही मन न लागल्याने पुन्हा क्रिकेटकडे वळाला. यावेळी मात्र प्रदर्शन चांगले न झाल्याने फेब्रुवारी २०१० मध्ये स्पर्धात्मक क्रिकेटचा अखेरचा सामना खेळत त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.
वाचनीय लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग