मुंबई । सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये टी नटराजाने डेथ-ओव्हर्स स्पेशालिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच नटराजनने आपल्या अचूक यॉर्करने क्रिकेटमध्ये खास ठसा उमटविला आहे, त्याने आपल्या कुटुंबासाठी सर्व काही केले, परंतु आपल्या आईला तो रस्त्याच्या कडेला बसून चिकन विक्री करण्यास मनाई करू शकला नाही.
नटराजनचे मार्गदर्शक जयप्रकाश याबाबत म्हणाले की, ‘या वेगवान गोलंदाजाच्या आईला असे वाटते की, जेव्हा त्यांची परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हा त्यांच्या या कामामुळेच कुटुंबाला खूप मदत होत होती.’
क्रिकेट खेळून मिळालेल्या पैशांमधून नटराजनने आपल्या पालकांसाठी एक घर बांधले, आपल्या बहिणींना शिक्षणाची व्यवस्था केली. तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात चिन्नपंपट्टी या गावात एक क्रिकेट अकादमी सुरू केली आणि क्रिकेट पासून दूर जाण्यापासून आपल्या सहकार्यांना परावृत्त केले.
तमिळनाडूच्या गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना त्याने खूप काही केले. जयप्रकाशने पीटीआयला सांगितले की, “त्याचे प्रदर्शन पाहून मला आश्चर्य वाटले नाही. कारण त्याने त्यासाठी परिश्रम घेतले आहेत. तो खूप अडचणीतून पुढे गेला आहे. तो दुखापतीतूनही सावरला आहे. उत्तम कामगिरीने त्याने राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. तो सनरायझर्स हैदराबादकडून संधी मिळताच, आता तो चांगली कामगिरी करीत आहे.”
नटराजनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2017 मध्ये प्रथम तीन कोटींमध्ये खरेदी केले होते, परंतु तो त्याच्या खेळीतून प्रभावित करू शकला नाही. 2018 मध्ये सनरायझर्सने त्यांची निवड केली होती, परंतु त्यावेळी त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने यंदाच्या हंगामात मात्र संधी मिळताच चांगली कामगिरी केली. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
T. Natarajan appreciation post ????????#DCvSRH #OrangeArmy #KeepRising #IPL2020 pic.twitter.com/srnXIR6U6j
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 29, 2020
त्याने 14 व्या आणि 18 व्या षटकांत अनेक यॉर्करच्या सहाय्याने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्याने चार षटकांत 21 धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोयनिसची विकेट घेतली. विशेष म्हणजे त्याने 7 यॉर्कर टाकले होते. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल मोसमात एका सामन्यात सर्वाधिक यॉर्कर टाकणारा गोलंदाज ठरला आहे. नटराजनचे वडील रोजंदारीवर मजुरी करीत होते. आपल्या आई-वडीलांना यापुढे त्रास होऊ नये आणि आपल्या बहिणींना योग्य शिक्षण मिळावे, अशी त्याची इच्छा आहे.