भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतासाठी विश्वासू गोलंदाज आहे. चहलने २०१६ मध्ये वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चहलने आतापर्यंत ५२ वनडे आणि ४२ टी२० सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले असून अनुक्रमे ९१ व ५५ विकेट्स मिळवले आहेत.
एवढी प्रभावी कामगिरी करूनही चहलला कसोटी संघात स्थान मिळाले नाही. यामुळे चहल (Yuzvendra Chahal) कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.
“भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत स्पर्धेत मला चांगले प्रदर्शन करावे लागेल. अलीकडच्या काळामध्ये कसोटी क्रिकेट खूपच आव्हानात्मक झाले आहे. आर अश्विन (R Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबतच कुलदीप यादवनेही (Kuldeep Yadav) कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मला सुद्धा कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. परंतु त्यासाठी मला देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून लाल चेंडूने चांगली कामगिरी करावी लागेल,” असे हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत चहल म्हणाला.
“मी आजपर्यंत फक्त ३१ प्रथम श्रेणी सामने खेळलो आहे. मला रणजी चषकात जास्त गोलंदाजी करून प्रभाव पाडण्याची आवश्यकता आहे,” असेही चहल पुढे म्हणाला.
“मला अश्विन आणि हरभजनच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे. मी हरभजनसोबत मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचे तीन हंगाम खेळलो आहेत. त्यामुळे हरभजनचा माझ्यावर प्रभाव आहे. एक फिरकी गोलंदाज म्हणून कसे आक्रमक व्हावे आणि फलंदाजावर कसे आक्रमण करावे, हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे.” असे हरभजन आणि अश्विनबद्दल बोलताना तो म्हणाला.
“ते दोघे मला प्रेरित करतात व दोघेही महान खेळाडू आहेत. मी विराटसोबत १५ वर्षांखालील क्रिकेट खेळलो आहे. मी गोलंदाजी दरम्यान जास्त धावा देत असेल, तर विराट नकारात्मक परिस्थितीतुन बाहेर येण्यासाठी मदत करतो. रोहित आणि विराट मला मोठ्या भावासारखे आहेत. दोघांनीही भारतासाठी खूप काही मिळवलं आहे, ते आम्हा सर्वांना प्रेरणा देतात,” असे रोहित आणि विराटची स्तुती करत चहल पुढे म्हणाला.