उद्यापासून(24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. 2019 विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर पहिल्यांदाच हे दोन संघ उद्या आमनेसामने येणार आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारताचे विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले होते.
त्याचमुळे या पराभवाचा बदला घेण्याचा विचार येतो का, असा प्रश्न भारताचा कर्णधार विराट कोहलीला गुरुवारी टी20 मालिकेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. यावर विराटने उत्तर दिले की न्यूझीलंडचे खेळाडू इतके चांगले आहेत की तूम्ही बदला वैगरे घेण्याचा विचार करु शकत नाही.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर तूम्ही बदला घेण्याचा विचार जरी केला तरी हे लोक इतके चांगले आहेत की तूम्ही बदला घेण्याचा विचार करुच शकत नाही. आमचे त्यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत आणि हे केवळ मैदानावर स्पर्धात्मक खेळण्याबद्दल आहे.’
तसेच विराट पुढे म्हणाला, ‘न्यूझीलंड हा असा संघ आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे खेळावे आणि स्वत:ला कसे सांभाळावे यासाठी योग्य उदाहरण समोर ठेवले आहे. आमच्या दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांबद्दल आदर आहे. ते जेव्हा विश्वचषकात अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरले त्याबद्दल आम्ही आनंदी होतो. कारण तूम्ही जेव्हा पराभूत होता तेव्हा तूम्हाला परिस्थिती स्विकारायची असते.’
https://twitter.com/BCCI/status/1220250312231018496
उद्या ऑकलँड येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.20 ला सुरुवात होणार आहे.






