आयपीएल 2021 च्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघातील 38 वर्षीय ज्येष्ठ फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संघाने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अमित मिश्राने चुकीचा ठरवत मुंबईमधील फलंदाजांचे कंबरडे मोडले. या सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ म्हणूनही घोषित करण्यात आले. सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याने आपल्या गोलंदाजीबद्दल आणि संघाच्या कामगिरीबद्दल वक्तव्य केले.
या सामन्यात त्याने 4 षटकांत 24 धावा देऊन चार बळी घेतले. त्यानंतर सामन्याच्या सादरीकरणात बोलताना तो, “मी फक्त चांगल्या जागी गोलंदाजी करण्याचा आणि बळी मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक गोलंदाजांची गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली असते. माझी शैली ही हवेत गोलंदाजी करण्याची असून त्यामध्ये मला काहीही बदल करायचा नाही. कधीकधी यामध्ये वेगही असतो. खेळपट्टीच्या अंदाजानुसार गोलंदाजी करून बळी मिळवण्याचा मी प्रयत्न करत असतो.”
“या सामन्यात मी मुंबईच्या ज्या फलंदाजांचा मी बळी घेतला ते सगळे मॅच विनर खेळाडू होते. अगोदर मी थोडा चिंतेत होतो परंतु मला माहित होते आमच्या संघातील खेळाडू हुशार आहेत. दोन सामने खेळल्यानंतर त्यांना या खेळपट्टीवरचा अंदाज आला आहे.” असे तो पुढे म्हणाला.
आयपीएलमध्ये मिश्रा पहिल्या सत्रापासून खेळत असून लसिथ मलिंगानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम त्याच्याच नावे आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५२ सामन्यात तब्बल १६४ गडी बाद केले आहेत. यात १७ धावा देऊन ५ गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच या यादीत अव्वलस्थानी मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने अवघ्या १२२ सामन्यात १७० गडी बाद केले आहेत. यात १३ धावा देत ५ गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्वाच्या बातम्या-
हे पोरगं भारीय! नाणेफेकीवेळी रिषभने रोहितला केल्या गुदगुल्या; Video पाहून व्हाल लोटपोट
दिल्ली-मुंबई लढतीत रोहित शर्माला दुखापत, पुढील सामना खेळणार की नाही? पाहा काय म्हणाला