भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेचा पाचवा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला 36 धावांनी हरवून मालिका 3-2 अशी जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे इंग्लंड संघाला कोणतीही संधी मिळाली नाही.
सामन्यासह टी२० मालिकाही गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात लाखो भारतीय चाहत्यांची मने जिंकणारे वक्तव्य केले.
भारतीय संघाने संधीचा फायदा घेत उत्कृष खेळी केली
मॉर्गन म्हणाला की, “त्यांच्या घरच्या मैदानात बळकट अशा भारतीय संघाचा खेळण्याचा अनुभव खूपच प्रभावी होता. आज शानदार असा एक सामना पाहायला आणि खेळायला मिळाला. सामन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाने आमचा पराभव केला आहे. त्यामुळे ते या विजयाचे हक्कदार आहेत. तथापि, आम्ही या मालिकेत बरेच चांगले क्रिकेटदेखील खेळले.”
“या मालिकेनंतर मागे वळून पाहताना अनेक सकारात्मक गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पूर्वीच्या सामन्यांमध्ये बर्याचदा असे दिसून आले की, मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. त्यामुळे मालिकेतील हे क्षण आमच्यासाठी खूपच भारी ठरले,” असे मॉर्गनने पुढे म्हटले.
याशिवाय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना मॉर्गन म्हणाला की, “आमच्याकडे अधिक चांगला खेळ करण्याचे कौशल्य आहे, याची आम्हाला जाणीव होती. परंतु आजचा दिवस आमचा नव्हता. तसेच बर्याच सामन्यांमध्ये पॉवरप्लेमधील गोलंदाजीने खूप महत्वाची भूमिका बजावली. नवीन भूमिकेत आदिल रशीदने ज्या पद्धतीने शानदार क्रिकेट खेळले, ते खरोखरच फायदेशीर आहे. त्याने आमच्यासाठी विकल्पाचे मार्ग उघडले आहेत.”
रोहित-विराटच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताचा विजय
शेवटच्या टी२० सामन्यात भारतीय संघाने आपली रणनीती बदलली आणि कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माला सलामीला उतरले. दोन्ही अनुभवी खेळाडूंनी शानदार क्रिकेट खेळल्याने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भर घातली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 2 गडी गमावून 224 धावा केल्या.
इंग्लंडच्या संघाकडून डेव्हिड मलानने शानदार फलंदाजी करत भारतीय संघाच्या लक्ष्याचा पाठलाग केला, परंतु असे असूनही इंग्लिश संघ निर्धारित २० षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 188 धावा करू शकला आणि सामना 36 धावांनी गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
जोस बटलरशी घातलेला वाद कोहलीला महागात पडणार? होऊ शकते ‘ही’ कारवाई
रोहितचा ‘अनोखा’ षटकार पाहून कोहली झाला भलताच खुश, रिऍक्शन पाहून म्हणालं सुपर!