आयपीएल 2025 स्पर्धेतील 50 वा सामना आज म्हणजेच 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तसेच मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात दोन खेळाडू गमावून 217 धावा केल्या. आता राजस्थानला जिंकण्यासाठी 218 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
मुंबई संघाने डावाची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे केली. मुंबईसाठी रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने प्रथम चांगली भागीदारी रचली, दोघांनीही अर्धशतके झळकावली. रिकल्टनने सर्वाधिक 38 चेंडूत 61 धावा केल्या, त्याने 3 षटकार तसेच 7 चौकार झळकावले. याचबरोबर रोहित शर्माने सुद्धा 36 चेंडू 53 धावा करत 9 चौकार झळकावले. त्यानंतर दोघेही एकापाठोपाठ बाद झाले.
त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागीदारी करत 217 धावांची धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवने 23 चेंडूत 48 धावा केल्या, तसेच हार्दिक पांड्याने सुद्धा 23 चेंडूत 48 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 4 चौकार तसेच 3 षटकार झळकावले. हार्दिक पांड्याने 6 चौकार तसेच 1 षटकार झळकावला.
मुंबईच्या शानदार फलंदाजी समोर राजस्थानचे गोलंदाज काही प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. रियान परागने आणि तीक्षणाने 1-1 विकेट्स घेतली. आता हे आव्हान राजस्थान पूर्ण करेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजस्थानसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.