---Advertisement---

शार्दुल ठाकूरने फलंदाजी करताना वापरली ही खास युक्ती

On: सोमवार, डिसेंबर 23, 2019 5:51 PM
---Advertisement---

कटक। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बाराबती स्टेडियमवर पार पडला . या सामन्यात भारतीय संघाने विंडीज संघाला 4 विकेटने मात देऊन मालिका 2-1ने खिशात घातली.

विंडीजने भारताला 316 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 47 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहली 85 धावा करुन बाद झाला. तो बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 29 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. तसेच भारताच्या हातात 4 विकेट्स होत्या. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी मैदानात आला. 

त्याने यावेळी मैदानात असलेल्या रविंद्र जडेजाला चांगली साथ देत 15 चेंडूत नाबाद 30 धावांची भागीदारी केली. यामध्ये शार्दुलने 6 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 17 धावा केल्या.

त्याच्या या खेळीमुळे भारताने 316 धावांचे लक्ष्य 48.4 षटकातच पार करण्यात यश मिळवले. या सामन्यानंतर शार्दुलने त्याच्या खेळीबद्दल त्याची भूमीका मांडली.

सामन्यानंतर शार्दुल म्हणाला, ‘कोहली बाद झाल्याचा विचार मी केला असता तर मी दबावात आलो असतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वत: ला खेळपट्टीवर स्थिरावलेला फलंदाज  मानत होतो. माझे संपूर्ण लक्ष चेंडू फटकावण्याकडे होते.’

‘मला माहित आहे की माझ्याकडे फलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. जेव्हा संघाला माझी गरज असेल तेव्हा मी 20-25 धावांचे योगदान देऊ शकलो तर मला आनंद होईल. मी पुढे जाऊन, अधिक सराव करू इच्छित आहे. फलंदाजीमध्ये योगदान देऊन मला आनंद होईल.’

या सामन्यात वेस्ट इंडिजने निकोलस पूरन(89) आणि कायरन पोलार्ड(74*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 5 बाद 315 धावा करत भारतासमोर विजयासाठी 316 धावांचे आव्हान ठेवले होते.

हे आव्हान भारताने 48.4 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून रोहित शर्मा(63), केएल राहुल(77) आणि विराट कोहली(84) यांनी अर्धशतके केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---