---Advertisement---

“आता जगाने ऑस्ट्रेलियाचे नाही तर भारतीय क्रिकेटचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे”

On: सोमवार, नोव्हेंबर 18, 2019 6:04 PM
---Advertisement---

22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे.

या सामन्याआधी जोरदार पाऊस पडल्यानंतरही बरीच मेहनत घेत क्युरेटरने खेळपट्टी वेळेपूर्वी तयार केली आहे. तसेच या सामन्यासाठी दोन्ही संघही मेहनत घेत आहेत.

या कसोटीबद्दल बोलताना बांगलादेशकडून कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावणारे क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अमीनुल इस्लाम यांनी म्हटले आहे की दिवस- रात्र कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा फायदा भारताच्या वेगवान गोलंदाजांना होईल.

‘वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यातील विविधता आम्ही पाहिली आहे. ते पाहून पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा भारताला फायदा होईल. तुम्ही जिथे खेळता तिथे संध्याकाळी अतिरिक्त वारा वाहताना दिसतो आणि त्याचा पुरेपूर फायदा भारत घेईल,  असे अमीनुल यांनी म्हटले आहे.

अमिनुल हकने बांगलादेशच्या कसोटी क्रिकेट पदार्पणात भारताविरुद्ध 145 धावांची खेळी खेळली होती आणि बांगलादेशकडून कसोटी शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.

अमिनुल यांनी भारताच्या सध्याच्या वेगवान गोलंदाजांवर प्रभावित होऊन त्यांची तुलना 1970 आणि 1980 च्या दशकातील वेस्ट इंडीज संघाच्या गोलंदाजीशी केली आहे.

भारताच्या गोलंदाजांची वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांशी तुलना करताना अमिनुल म्हणाले, ‘आम्ही आधी अनिल कुंबळेच्या नेतृत्वात भारताची फिरकी गोलंदाजी पाहिली होती पण आता वेगवान गोलंदाजांची वेळ आली आहे. भारतीय क्रिकेटमधील हा एक मोठा बदल आहे.’

‘त्याच्याकडे सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजी आहे. ही एकवेळच्या वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांसारखी आहे, ज्यांनी जगावर वर्चस्व गाजवले होते.’

तसेच भारतीय क्रिकेटचे कौतुक करताना अमिनुल म्हणाले की, आता अशी वेळ आली आहे जेव्हा ऑस्ट्रेलिया नव्हे तर जगाने भारतीय क्रिकेटचे अनुसरण केले पाहिजे.

ते म्हणाले, ‘सर्वसाधारणपणे सर्वजण ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे अनुसरण करतात. यामध्ये काहीही चूकीचे नाही. पण तुम्ही पाहिले तर भारतीय संघ सातत्यपूर्ण आहे. ते प्रेरणादायी ठरु शकतात. त्यांनी उच्च स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे.’

याबरोबरच अमिनुल यांनी असेही सांगितले की पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी सौरव गांगुलीने त्यांना आमंत्रित केले आहे. त्यामुळे जर शक्य झाले तर ते या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---