मुंबई । भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याची नुकतेच, देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा मान मिळवणारा तो देशातील चौथा क्रिकेटर आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. इंग्लंडमध्ये मागील वर्षी विश्वचषकामध्येही त्याने विक्रमी पाच शतके ठोकली होती.
दरम्यान, माजी अनुभवी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि सांगितले की, ”मलाही त्याच्यासारखा फलंदाज व्हायला आवडेल.”
इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “रोहित शर्मा वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकापासून धावांचा पाऊस पाडायला सुरुवात करतो. मलाही अशाच प्रकारे खेळायचे होते.” तसेच त्यांनी असेही कबूल केले की “परिस्थिती आणि आपल्या क्षमतेवर विश्वास नसल्यामुळे असे करता आले नाही.”
“जेव्हा पुढची पिढी हे करताना पाहते तेव्हा खूप आनंद होतो, मला पुढची पिढी बघायला आवडते, कारण तुम्हाला तिथे प्रगती दिसते. आपण स्पष्टपणे पहात आहात की तो पुढील पिढीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म तयार करत आहे,” असे गावस्कर यांनी सांगितले.
रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याचा संघ मुंबई इंडियन्ससोबत यूएईमध्ये पोहचला आहे. आयपीएलमध्ये रोहितने 188 सामन्यात 31.60 च्या सरासरीने 4 हजार 898 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहली आणि सुरेश रैना नंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत तो तिसर्या क्रमांकावर आहे.






