कोणत्याही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही. कर्णधारपद ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्याबरोबर अन्य १० खेळाडूंसह संघाला पुढे न्यायचे असते. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न सर्वांचे पूर्ण होते असे नाही.
पण काही क्रिकेटपटूंना ही सुवर्णसंधी मिळते. त्यातही काहींना अगदी कारकिर्दीच्या शेवटी-शेवटी ही संधी मिळते. तर काहींना नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधारपद निभावण्याची संधी मिळते. पण काही क्रिकेटपटू इतके नशीबवान असतात की त्यांना त्यांच्या लहान वयातच ही सन्मानाची जबाबदारी मिळते.
अशाच भारताच्या सर्वात युवा वनडे कर्णधारांबद्दल या लेखात जाणून घेऊया.
भारताचे सर्वाय युवा वनडे कर्णधार
५. विराट कोहली (२४ वर्षे २३९ दिवस)
सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहली हा केवळ एक उत्तम फलंदाज नाही तर तो एक अत्यंत दर्जेदार कर्णधार देखील आहे. २००८ मध्ये आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा कर्णधार कोहलीने २ जुलै २०१३ रोजी किंग्स्टनविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याचे वय २४ वर्ष २३९ दिवस एवढे होते.
त्यावेळी नियमित कर्णधार एमएस धोनीच्या अनुपस्थितीत त्याला कर्णधार पद देण्यात आले होते. त्या सामन्यात वनडे कर्णधारपदाचा अनुभव एक कर्णधार म्हणून त्याला पहिल्यांदा आला होता. त्यानंतर धोनीने २०१७ ला कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीला भारताच्या वनडे संघाचाही नियमित कर्णधार करण्यात आले.
३१ वर्षीय कोहलीने ८९ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या कर्णधार पदाखाली ६२ सामने जिंकले आहेत तर २४ सामने गमावले आहेत आणि २ सामान्यांचा निकाल लागला नाही.
४. वीरेंद्र सेहवाग (२४ वर्षे १७८ दिवस)
माजी भारतीय आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग एक यशस्वी फलंदाज होता. याबरोबरच २००३ ते २०१२ या कालावधीत सेहवागने १२ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यात संघाने ७ सामने जिंकले आणि ५ सामने गमावले.
१६ एप्रिल २००३ रोजी ढाका येथे बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाने सामना खेळाला तेव्हा सेहवागने २४ वर्ष १७८ दिवसांच्या वयात भारतीय संघासाठी प्रथमच कर्णधारपदाचा अनुभव घेतला होता. त्यानंतर ८ डिसेंबर २०११ मध्ये इंदोर येथे वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सामन्यात कर्णधार म्हणून सेहवागने वैयक्तिक २१९ धावांचा विश्वविक्रम केला आहे.
३. कपिल देव (२३ वर्षे २४९ दिवस)
भारताचा महान अष्टपैलू कपिल देव हे भारताच्या महान कर्णधारांपैकी एक होता. ज्यांनी संघाला उच्च स्तरावर नेले. त्याच्या नेतृत्वात भारताने १९८३ मध्ये प्रथमच आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकला.
त्यांनी सर्वात आधी १२ सप्टेंबर १९८२ मध्ये श्रीलंकेविरूद्ध अमृतसर येथे झालेल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. त्यावेळी त्यांचे वय २३ वर्ष २४९ दिवस होते. त्यावेळी ते फक्त भारताचे सर्वात युवा वनडे कर्णधारच नव्हते, तर जगातील दुसर्या क्रमांकाचे युवा वनडे कर्णधारही होते.
त्यांच्या नेतृत्वात १९८२-१९८७ मध्ये भारताने ७४ वनडे सामन्यांपैकी ३९ सामने जिंकले आणि ३३ सामने गमावले तर दोन सामान्यांचा निकाल लागला नाही.
२. सुरेश रैना (२३ वर्षे १८२ दिवस)
डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा नियमित कर्णधार कधी नव्हता. परंतु वनडे कर्णधार एमएस धोनीच्या अनुपस्थितीत २०१० आणि २०१४ दरम्यान त्याचा भारतीय वनडे कर्णधार म्हणून छोटासा प्रवास झाला. २८ मे २०१० रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या बुलावायो वनडे सामन्यात रैनाने पहिल्यांदा २३ वर्ष १८२ दिवसांच्या वयात भारतीय संघाचे नेतृत्व केले.
त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत त्याने १२ वनडे सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले. त्यात त्याला ६ सामने जिंकण्यात यश आले तर ५ सामने गमवावे लागले आणि एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
१. सचिन तेंडुलकर (२३ वर्षे १२६ दिवस)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद आहे. फलंदाजीत त्याने अनेक विक्रम केलेत. परंतु भारतासाठी सर्वात युवा वनडे कर्णधार म्हणून एक वेगळा विक्रम अजूनही त्याच्या नावे आहे.
वयाच्या अवघ्या २३ वर्ष १२६ दिवसांच्या कालावधीत सचिनने २८ ऑगस्ट १९९६ मध्ये श्रीलंकेविरूद्ध कोलंबो (आरपीएस) येथे वनडे सामन्यात प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
सचिनचा कर्णधारपदाचा काळ उल्लेखनीय नव्हता. १९९६ ते २००० या काळात सचिनने ७३ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यात त्याने २३ सामने जिंकले आणि ४३ सामने गमावले तर एक सामना बरोबरीत सुटला आणि ६ सामन्यांचा निकाल लागला नाही.
वाचनीय लेख –
वनडे क्रिकेट इतिहासातील हारता-हारता जिंकलेले ५ सामने…
वय तर केवळ आकडा! वयाच्या पस्तिशीनंतर कसोटीत पदार्पण करणारे ४ क्रिकेटपटू…
२ देशांचे प्रतिनिधित्व केलेले ५ क्रिकेटपटू; एकजण खेळलाय भारत आणि पाकिस्तानकडून